

विजय लाळे
विटा : खानापूर तालुक्यात पक्ष बळकट करत स्वतःचे राजकिय भवितव्य बांधण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, शरद पवारांपासून जयंत पाटलांपर्यंत उद्धव ठाकरेंपासून राज ठाकरेंपर्यंत, हिंदुत्वापासून कुंभमेळापर्यंत, राज्यातल्या प्रत्येक घडामोडींवर आपली भूमिका ठासून मांडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून का मौनात गेलेत, याचे कारण गुलदस्त्यात आहे.
खानापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाण्यासाठी आंदोलन केलं, ते गप्प राहिले. कार्यकर्ते रस्ता कामातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन केलं, ते चूप बसले. सामान्यांच्या अन्यायाविरोधात कार्यकर्ते ओरडले, ते शांत राहिले, पक्षातल्या गटबाजीबद्दल ते काही बोलत नाहीत. शेवटी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यां नी राजीनामे दिले आणि वैभव पाटील यांनी पक्षात प्रवेश केला तरीही ते बोलायला तयार नाहीत.
खानापूर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून पक्ष वाढीसाठी आक्रमकपणे प्रयत्न करणारे भाजपचे बेधडक, निडर, मुलुख मैदानी तोफ समजले जाणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वर उल्लेखित घटनांवर मात्र तोंडातून शब्द काढलेला नाही. एरवी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि विविध समाजमाध्यमांतून आपली भूमिका हिरीरीने मांडणारे आमदार पडळकर सध्या खानापूर तालुक्यातील ताज्या घडामोडींवर मात्र शांत आहेत.
आटपाडी तालुक्यातील गाव खेड्यातून उपेक्षित समाजातून आलेल्या गोपीचंद पडळकर यांनी २००४-०५ च्या दरम्यान समाजकारण राजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी आक्रमकपणे प्रत्येक गोष्टीत प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान उठवले आणि बघता बघता जनसामान्यांचा आवाज म्हणून पुढे आले. त्यांनी २००९,२०१४,२०१९ या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकांमध्ये लोकसभा, विधान सभेसाठी उमेदवारी केली. त्यांत त्यांना यश आले नाही. पण २०१२-१३ नंतर त्यांनी विट्या सह खानापूर तालुक्यात थेट आपला स्वतः गट निर्माण करायला सुरुवात केली. तेव्हापासून आजअखेर अनेक कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात आहेत.
पूर्वी राष्ट्रीय समाज पक्ष त्यानंतर बहु जन वंचित आघाडी आणि आता भाजप या पडळकर यांनी केलेल्या पक्षांतराबरोबरच खानापूर तालुक्यातीलही अनेक कार्यकर्ते आज अखेर त्यांच्यासोबत राहिलेले आहेत. आपल्या निर्भिड, सडेतोड आणि थेट बोलण्याच्या स्वभा वाची लोकांना भूरळ आहे. परंतु गेल्या महिना भरातील खानापूर तालुक्यातील घडामोडींबा बत मात्र त्यांनी मौन बाळगलेले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. तालुक्यातील काही महत्त्वाच्या पदाधि काऱ्यांनी तर थेट पदांचे राजीनामेच दिले आहेत.
सन १९९० पासून जेव्हा खानापूर आणि आटपाडी मतदार संघ होता, त्यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्या युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपकडे होता. मात्र तरीही खानापूर तालुक्यात मूळ भाजप हा पूर्वीपासून च आमदार बाबर आणि आमदार पाटील अशा दोन गटांत विभागला होता. परिणामी भाजप चा अधिकृत उमेदवार असूनही २०१४ पर्यंत या मतदारसंघात भाजप ला (पक्षी युतीला) कधीही यश मिळालेले नाही.
२००९ ला गोपीचंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघात विधानसभेला भाजपकडून उमेदवारी केली आणि त्यांना तीन नंबरची म्हणजे २० टक्क्यांहून अधिक मते मिळाली. त्यापूर्वी २००९ ला ते रासपच्या चिन्हावर उभे होते, त्यांना १० टक्के मते मिळाली होती. त्यानंतर ते जेव्हा सांगली लोक सभेसाठी लढले, त्यावेळीही त्यांना खानापूर तालुक्यातून चांगली मते पडली होती. या बरोबरच गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र स्वतः गोपीचंद पडळकर यांना जत मधून उमेदवारी मिळाल्याने खानापूरातून ब्रह्मानंद पडळकर यांचा अर्ज मागे घेण्यात आला.
गेल्या वर्षभरापासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकां मध्ये पक्षीय पातळीवर भाजप उतरणार आणि त्यासाठी आवश्यक ती कुमक आपण देऊ, असे पडळकर बंधूंनी जाहीर केले होते तसेच त्या दृष्टीने सर्व ती तयारी सुरू केली होती. मात्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी भाजपात प्रवेश करून खळबळ उडवून दिली आणि आमदार पडळकर हे मात्र मौनात गेलेत.