

सांगली : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, पोलिसांवर दबाव दिसून येत आहे. ही गुन्हेगारी मुळापासून उपटून टाकण्यासाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक अर्थात 'फ्री हँड' दिला पाहिजे. गुन्हेगारांचे तीन-चार एन्काऊंटर केल्याशिवाय सांगली जिल्हा शांत होणार नाही, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
कुपवाड येथे फरीद शेख याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सांगली बंद आणि निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात बोलताना आमदार पडळकर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. जिल्ह्यात खून, प्राणघातक हल्ले आणि गँगवारचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचा आरोप आमदार पडळकर यांनी केला.
उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास करा
या गंभीर परिस्थितीत पोलिसांनी 'उत्तर प्रदेश मॉडेल'चा अभ्यास करून ते तत्काळ अमलात आणण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे कठोर कारवाई करत गुन्हेगारी मोडीत काढण्यात आली, तशीच कडक पावले सांगलीतही उचलली पाहिजेत. वेदांत बंडगर हत्या प्रकरणातही संशयित आरोपी नीलेश गडदे याचा एन्काऊंटर करायला हवा होता, असेही ते म्हणाले.