

सांगली : उपसा सिंचन योजनांचे पाणी बंद जलवाहिनीद्वारे वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे, त्यांना जमिनीचे वार्षिक भाडे दिले जाणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 च्या नवव्या पुष्पाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वारणाली वसाहतीतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
ते म्हणाले, हवामान अंदाजात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने पावसाच्या अनियमिततेचे पूर्वानुमान शक्य होत आहे. या वर्षी जून व जुलै महिन्यात कमी पाऊस व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज आहे. याबाबत जनप्रबोधन करण्यासाठी हा पंधरवडा उपयुक्त ठरेल.
कार्यशाळेत पीक पद्धतीत बदल, उत्पादनवाढ आणि जलसंसाधनांचे कार्यक्षम व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.