

आटपाडी : दिघंची जिल्हा परिषद गटात यंदा तरुणाईने आपला ठसा उमटवला. पुजारवाडी (ता. आटपाडी) येथील अवघ्या २२ वर्षीय पृथ्वीराज पाटील यांनी शिवसेना शिंदे गटामार्फत उमेदवारी करत दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे त्यांनी जिल्हा परिषदेत दमदार एन्ट्री करत राजकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू केले आहे.
आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत पृथ्वीराज यांनी घराण्याची राजकीय परंपरा पुढे नेली असली, तरी हा विजय त्यांच्या कर्तृत्वाचा मानला जात आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी सामाजिक कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली. युवकांचे संघटन,विविध प्रश्नांचा पाठपुरावा आणि सक्रिय संपर्क यामुळे त्यांच्याविषयी विश्वास निर्माण केला. निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी रिंगणात उतरत आत्मविश्वासपूर्ण प्रचार केला आणि मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांना भरघोस मताधिक्य दिले.
चुलते शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठींबा लाभल्याने त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले. या यशामागे राजकीय वारशाचा भक्कम पाया आहे. २००२ साली तानाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादीकडून आटपाडी गटातून निवडून येत जिल्हा परिषदेत ठसा उमटवला होता. निधी खेचून आणण्याची त्यांची धडाडी आणि विकासकामांवरील भर जिल्ह्यात गाजला.२०१२ मध्ये मनीषा तानाजीराव पाटील यांनी दिघंची गटातून विजय मिळवत कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून विकासाला चालना दिली. या परंपरेत आता पृथ्वीराज पाटील यांची भर पडली आहे. तरुणाईची उर्मी, अनुभवाचे मार्गदर्शन आणि जनतेचा आशीर्वाद यांच्या बळावर मिळालेला हा विजय दिघंची गटातील नव्या नेतृत्वाचा उदय ठरला आहे. ‘मिनी मंत्रालयात’ तरुणाईचा आवाज अधिक बुलंद होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.