

जयसिंगपूर / दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील भाजीपाला व्यापारी भरतेश राजगोंडा टोपगोंडा (40) यांचे सोमवारी रात्री अपहरण करून 25 लाखांच्या खंडणीसाठी त्यांची विद्युत शॉक देऊन निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली असून, जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राजदीप अजय ताडे (वय 21) आणि टिल्लू ऊर्फ मंथन राजेंद्र चंदुरे-पवार (21, दोघे रा. दानोळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भरतेश टोपगोंडा सोमवारी रात्री 9 च्या सुमारास घरी जाताना अपहरणकर्त्यांनी त्यांना वाटेत अडवले. त्यानंतर आरोपींनी भरतेश यांच्याच मोबाईलवरून त्यांचे चुलत भाऊ शांतिनाथ टोपगोंडा यांना फोनवरून 25 लाखांची मागणी केली. रक्कम घेऊन शांतीनगर येथे बोलावले. मात्र, नातेवाईक त्या ठिकाणी पोहोचले असता आरोपींनी जागा बदलून त्यांना ग्राऊंड पट्टीवर येण्यास सांगितले. तिथे पोहोचल्यानंतर भरतेश यांचा मोबाईल बंद झाला. यामुळे कुटुंबीयांची धाकधूक वाढली. घाबरलेल्या ग्रामस्थांनी रात्री 11 वाजता पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. शोधमोहीम राबवली असता मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास शेरीमळा रस्त्यावरील उसाच्या शेतात भरतेश यांची दुचाकी व चप्पल आढळली. दुपारी 12 च्या सुमारास त्याच परिसरात त्यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात आरोपींनी विद्युत करंट देऊन त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.