

सांगली :शेतकऱ्यांच्या प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा पुढारी ॲग्रीपंढरी कृषी प्रदर्शनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. येथील छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या परिसरात शुक्रवारपासून सुरू झालेल्या पुढारी ॲग्रीपंढरीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी काकडे बोलत होते.
मशागत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संतुलित पोषणमूल्यांच्या जोरावर 75 पेक्षा जास्त प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फुलांच्या प्लॉट्सची आणि पिकांची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की, कृषी क्षेत्रात रोज नवनवे आव्हान उभे राहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे. ‘ॲग्री पंढरी’च्या प्रदर्शनामुळे विक्रमी उत्पादनाचे गुपित जाणून घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. त्याचबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे तंत्र तज्ज्ञांकडून थेट शिकता येणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे शासनाचे नेहमीच प्रयत्न असतात. शेतकऱ्यांपुढे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उत्पादन दर्जेदार व अधिक करण्याची गरज आहे. पुढारी ॲग्रीपंढरीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी माहिती मिळणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.