

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे चार वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बुधवार, दि. १ जुलै रोजी रात्री ही घटना घडली. श्रीवर्धन रायाप्पा चटर्जी (वय ४ वर्षे, रा. पिंगळे मळा, हरिपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.
चटर्जी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबात बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरासमोर मंडप घातला होता. या मंडपासाठी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला होता. कार्यक्रम झाल्यानंतर चटर्जी कुटुंबीय रात्री अकराच्या सुमारास घरी परतले. गाडीतून उतरल्यानंतर श्रीवर्धन याने मंडपासाठी उभारलेल्या लोखंडी खांबाला हात लावला.
मंडपाच्या लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरू होता. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून श्रीवर्धन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.