

सांगली : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन आठ दिवसांत संयुक्त पंचनामे करावेत. बाधित शेतकर्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई जमा होईल, यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने आयोजित अधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्यासह नियोजन, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यासाठी शासन शेतकर्यांच्या पाठीशी आहे. संबंधित विभागांनी सुरू असलेली कार्यवाही गतीने करत आठ दिवसांत नुकसानभरपाईचे पंचनामे करावेत. पिकांव्यतिरिक्त झालेल्या नुकसानीसाठी पंचनाम्यानुसार प्राप्त निधीचे वाटप तातडीने करण्यात यावे. जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिकार असलेल्या बाबी प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असेही त्यांनी सांगितले.