

वारणावती : वारणा (चांदोली) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिचलन सूचीनुसार धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी, २७ जुलैस दुपारी ४.३० वाजता धरणाचे चारही दरवाजे उघडले. वारणा नदीपात्रात २००० व जलविद्युत प्रकल्पातून १४०० असा एकूण ३,४०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.
पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास अथवा धरणातील पाण्याची आवक वाढल्यास स्थितीनुसार विसर्गात वाढ करण्यात येईल, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरणाची पातळी ६२०.६५ मीटर नोंद झाली. धरणातील एकूण जलसाठा २८.४२ टीएमसी (८२.६२ टक्के) असून उपयुक्त जलसाठा २१.५४ टीएमसी (७८.२८ टक्के) आहे. गतवर्षी याचदिवशी धरणातील उपयुक्त जलसाठा २२.३३ टीएमसी (८१.१३ टक्के) होता.
धरण परिसरात गेल्या २४ तासात ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान १,३७२ मिलिमीटरवर पोहोचले आहे. सध्या धरणात ८,१२६ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नदीपात्रात उतरणे, पोहणे, कपडे किंवा जनावरे धुणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.