

आष्टा : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथे माजी उपसरपंच भोजराज घोरपडे (वय 38) यांच्यावर शुक्रवार दि. 23 रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल आमराईसमोर सत्तुरीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण वाळवा तालुक्यात खळबळ उडाली आहे. आष्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा बावची येथील आठजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली आहे.
भोजराज प्रदीपसिंह घोरपडे,संदीप खोत व चेतन गावडे अशी जखमींची नावे आहेत. तर रोहीत ज्ञानदेव सुतार (वय 27),अजय वसंत जाधव वय(21),साहिल अल्ताफ हवालदार(वय 21),सागर रवींद्र शिंदे(वय 25) व प्रथमेश बंडाजी यादव (वय 22 सर्व रा. बावची ता.वाळवा)अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. अवधूत गणपती माळी(वय 26, रा.बावची) हा जखमी असून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.तर स्वप्नील जाधव व सहदेव पाटील हे संशयीत फरारी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहादूरवाडी येथील हॉटेल आमराईसमोर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. यावेळी भोजराज घोरपडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून वरील संशयितांनी बाहेर जाऊन धारदार शस्त्रे आणली. त्यातील कमरेला रिव्हॉल्व्हर लावलेल्या एकाने धारदार शस्त्र भोजराज यांच्यावर उगारले, तर रोहित सुतार याने सत्तुरीने घोरपडे यांच्या डोक्यात मागील बाजूस जोरदार वार केला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी झटापट केली असता यामध्ये संदीप खोत व चेतन गावडे हेही जखमी झाले. या हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले. याबाबत भोजराज घोरपडे यांनी आष्टा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे.आष्टा पोलिस या घटनेचा तपास करीत आहेत.