

शिराळा : शिराळा तालुक्यात पावसाने पुन्हा जोर धरल्याने जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील अंत्री धरण १०० टक्के भरले असून त्याच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. याशिवाय, शिवणी धरण ७२ टक्के, चांदोली धरण ६६ टक्के, तर रेठरे धरण ८६ टक्के भरले असून तालुक्यातील सर्व ४५ पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.
चांदोली अभयारण्यात गेल्या २४ तासांत पाथरपूंज येथे १४९ मिमी आणि वारणावती येथे ४१ मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा, कोकरूड, चरण, आरळा, शिरशी, सांगाव आणि मांगले परिसरात पावसाची रिपरिप कायम आहे. अंत्री धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मानकरवाडी, शिरशी, निगडी व आंबेवाडी गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे.
दुसरीकडे, वारणा व मोरणा नद्यांचे पाणी पात्रात परतल्याने नदीकाठच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून पुराचा तात्पुरता धोका टळला आहे. तालुक्यात आतापर्यंत खरीप हंगामातील ७१ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून भात लागवडीलाही वेग आला आहे.