

मिरज : अनेक नाटकांवेळी किंवा चित्रपटांच्यावेळी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अडचणीत असतो. अशावेळी प्रेक्षकांनी बघ्याची भूमिका न ठेवता अभिनेत्यांच्या आणि निर्मात्यांच्या बाजूने राहून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी शनिवारी केले.
मिरजेत वसंत व्याख्यानमाला सुरू झाली. व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी नाटक व चित्रपटामधील अनेक चांगले आणि वाईट अनुभव सांगितले. अभिनेते जितेंद्र, शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकारांच्या आठवणी देखील प्रेक्षकांना सांगितल्या. ते म्हणाले, नाटके ही दीड-दोन महिने तालमी करून पुढे सादर होतात. सिनेमामध्ये तेथेच रिहर्सल करून अभिनय केला जातो. असे अनेक फरक नाटक आणि सिनेमांमध्ये असतात.
ते म्हणाले, मराठी प्रेक्षक हा अत्यंत आपुलकीने नाटक, चित्रपट पाहायला येतो, असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मात्र अलीकडे काही वर्षांमध्ये त्यांच्यात बदल झाला आहे. मलाही एका नाटकासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. माझ्या नाटकाला शासकीय विरोध झाला होता. त्यावेळी मी न्यायालयाच्या निर्णयामुळे ते नाटक करू शकलो. त्यावेळी माझ्या बाजूने न्यायालय होते. पण प्रेक्षकांनी मात्र त्यावेळी बघ्याची भूमिका घेतली. प्रेक्षक म्हणून अशा लढ्यामध्ये बघायची भूमिका न ठेवता पाठिंबा दिला पाहिजे. ते म्हणाले, प्रेक्षकांना जे आवडेल ते त्यांना देत राहणे हा व्यावसायिक नाटकांचा गाभा आहे. मला काही तरी प्रेक्षकांना वेगळं दाखवायला नेहमी आवडतं. त्यामुळे मी व्यावसायिक नाटके न करण्याचा निर्णय घेतला. तो आजही मी पाळला. चित्रपटांमध्येही व्यावसायिकता मी स्वीकारली नाही.
ते म्हणाले, यशाचे मोजमाप आपण काय ठरवतो, हे खूप महत्त्वाचे आहे. अर्थकारण हे खूप महत्त्वाचे आहे. 2 कोटी खर्च करून 3 कोटी कमाई केली, यापेक्षा 5 लाख खर्च करून 5 कोटी कमविले, हेही महत्त्वाचे आहे.