जतमधील २९ गावच्या पाणी प्रश्नी पडळकर यांचा पुढाकार; मुंबईत पाणीपुरवठा मंत्र्यांसमवेत बैठक
जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील २९ गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासित केले होते. या गावांना सोयीस्कर योजना देण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. आजच पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.
ही बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी (दि.१ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजता पार पडणार आहे. या बैठकीस विधान परिषद सदस्य आ . गोपीचंद पडळकर, आ .विक्रम सावंत ,पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव, मुख्य अभियंता जिल्हा परिषद सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवन प्राधिकरण , कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण सांगली व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी यांच्यासह २९ ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित असणार आहेत.
काय आहे ‘त्या’ २९ गावाची मागणी
जत तालुक्यातील २९गावांमध्ये प्रादेशिक योजनेअंतर्गत योजना मंजूर होऊन निविदा प्रक्रिया झाली आहे. परंतु २९ गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून प्रादेशिक योजनेऐवजी स्वतंत्र पाणीपुरवठा अथवा सोयीस्कर योजना मंजूर करावी.अशी मागणी आहे. प्रादेशिक योजनेला ग्रामपंचायतीसह नागरिकांचाही विरोध आहे. याबाबत आमदार पडळकर यांच्याकडे जत तालुक्यातील सरपंचांनी ही योजना रद्द होऊन नव्याने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करावी आशी मागणी केली आहे. आ. पडळकर यांनी यासंदर्भात विधान परिषदेच्या सभागृहात तसेच गुलाबराव पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे . मुंबई येथे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणे अपेक्षित आहे.२९ गावा करीता असलेल्या प्रादेशिक योजना रदद करून या गावांसाठी स्वतंत्र योजना राबवण्यात यावी. या गावांचा समावेश जलजीवन योजनेत करावा अशी मागणी आहे.