आमच्या १६ जणांचा हिशोब बाजूला काढला तरी सरकार बहुमतात : आमदार बाबर
विटा; पुढारी वृत्तसेवा : आमच्या १६ जणांचा हिशोब बाजूला काढला तरी सरकार बहुमतात त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे सांगली जिल्ह्यातील नेते आमदार अनिल बाबर यांनी दिली.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात आज सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा दिला आहे. याबाबत आमदार बाबर म्हणाले, मला विश्वास होता. आता कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी काही गोष्टी, काही त्रुटी झाल्या परंतु आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आता एवढ्या मोठ्या प्रक्रियेत काही गोष्टी ठरवून होत नसतात. अर्थात न्यायालयाच्या काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आहेत, परंतु मी काय प्रत्यक्ष बघितलेले नाही मी दिवसभर आज लग्न वास्तुशांती वगैरे कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. न्यायालयाच्या वेगवेगळ्या निरीक्षणाबाबत मी बोलणे उचित ठरणार नाही. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदेतज्ञ घटनातज्ञ वगैरे बोल तील आणि विधानसभा अध्यक्षांकडे ज्यावेळे ला आमचा निर्णय असेल, त्यावेळी आमच्या सगळ्यांचं म्हणणे जे आहे ते एकत्रित दिले जाईल असेही आमदार बाबर यांनी सांगितले.