सांगली : वाढले बिबट्यांचे हल्ले | पुढारी

सांगली : वाढले बिबट्यांचे हल्ले

शिराळा; विठ्ठल नलवडे : शिराळा तालुक्यात गव्यांचा उपद्रव, बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. पशुधनावर दररोज हल्ले होत आहेत. तालुक्यातील 92 गावांत गवे, बिबट्यांचे दर्शन वारंवार होत आहे. वर्षभरात 196 पशुधनांवर हल्लेे झाले आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. चांदोली अभयारण्यातील अन्नसाखळी कमकुवत झाली असावी, त्यामुळे बिबटे अन्नाच्या शोधासाठी जंगलाबाहेर पडले असावेत. अभयारण्यातील अन्न साखळी वाढवण्याची गरज असल्याचे जाणकारांचे मत आहे.

तालुक्यातील 92 गावांत बिबट्यांचा हल्ला तर गव्यांचा उपद्रव सुरू आहे. शेतीच्या नुकसानीच्या वर्षात 232 घटना घडल्या आहेत. तडवळे येथे फेब्रुवारी 2022 मध्ये ऊस तोडणी मजूर मुलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केलेे. येलूर व ऐतवडे येथे गव्याने हल्ला करून शेतकरी जखमी केले. बिबट्याच्या हल्लात 22 फेब्रुवारी 2021 ला ऊस तोडणी मजूर मुलगा मृत्युमुखी पडला होता. 2016 मध्ये गव्याचे हल्लात काळूंद्रे येथील एक व्यक्ती मृत्युमुखी पडली.

तालुक्यात चांदोली अभयारण्यातील गवे बाहेर पडले. गव्यांमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दि. 28 ऑगस्टला कार्वे येथील शेतकर्‍याची गाय मारली. डिसेंबर 2021मध्ये कापरी येथील सुभाष तांदळे याच्या 24 मेेंढ्या, मरळनाथपूर येथील सतीश थोरात यांच्या 11 मेंढ्या बिबट्यांच्या हल्लात मरण पावल्या.

अभयारण्याभोवती कंपाऊंडची गरज

चांदोली अभयारण्याला कंपाऊंड करावे, ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अभयारण्यालगतच्या गावातील लोकांनी केली आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्यामुळे आता ती गरज निर्माण झाली आहे. चांदोली अभयारण्यातील प्राण्यांना अटकाव नाही. त्यामुळे वन्यप्राणी जंगलात बाहेर पडत आहेत.

प्रशिक्षित मनुष्यबळ, यंत्रणेचा अभाव

शिराळा तालुक्याबरोबर वाळवा तालुक्यात प्राण्यांची दहशत वाढत चालली आहे. मात्र जंगलातून पडलेल्या या वन्यप्राण्यांना पकडून जंगलात सोडण्याची कोणतीच यंत्रणा व प्रशिक्षित मनुष्यबळ सध्यातरी वनविभागाकडे नाही. या प्राण्यांना पकडण्याचे अधिकारही येथील विभागाला नाहीत. त्याची परवानहीही त्यांना नागपूरहून घ्यावी लागते. जिल्ह्यात सध्या बिबटे, गवे, मगर, लांडगे, तरस, हरणे, रानडुक्कर या हिंस्र प्राण्यांचे दर्शन आणि वावर नित्याचाच झाला आहे. चांदोली अभयारण्य परिसराला लगत असलेल्या शिराळा व वाळवा तालुक्यात सातत्याने बिवटे व गवे लोकांना दिसत आहेत. जंगलात पुरेसे भक्ष्य मिळत नसल्याने अन्न- पाण्याच्या शोधात हे हिंस्र प्राणी जंगलाबाहेर पडू लागले आहेत. प्रशिक्षित रेस्क्यू टीमची गरज तालुक्यात वाढली आहे. तालुक्यातील 92 गावांतील लोकवस्तीत वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे अशा प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे प्रशिक्षित रेस्क्यू टीम त्यांना आधुनिक शस्त्रे, सापळे पुरवणेही गरजेचे आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा होण्याची गरज आहे.

बिवट्यांकडून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. तर गवे – रानडुक्कर यांच्याकडून पिकांचे मोठे नुकसान होत आहे. माणसांवरही हल्ल्याचे प्रसंग घडले आहेत. या घटनांमुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची लोकांच्यातून मागणी होत असते. मात्र, त्या परिसराला भेट देऊन पाहणी करणे व लोकांना प्रबोधन करणे या पलिकडे स्थानिक वनाधिकारी व कर्मचार्‍यांना कोणतेच अधिकार नाहीत. शिवाय लोकवस्तीत शिरलेल्या अशा प्राण्यांना तातडीने पकडण्यासाठी सापळे, आधुनिक हत्यारे व प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Back to top button