सांगली : पुढारी वृत्तसेवा शेअर्स कंपनीचे नाव बदलून, चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून लोकांची पुन्हा रोजरोसपणे लूट सुरू असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पैसे गुंतवणूक केलेल्यांच्यात खळबळ उडाली आहे. पैसे गुंतवणूकदार एकत्र येणार असून लवकरच बैठक होणार आहे. पैसे परत मिळवण्यासाठी शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते ताजुद्दीन तांबोळी यांनी दिली.
दरम्यान, पैसे परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांनी पोलिसांच्या आर्थिक शाखेकडे आज धाव घेऊन पैसे गुंतवणुकीची माहिती दिली. त्यांना तक्रार देण्यासाठी कागदपत्र घेऊन सोमवारी बोलवण्यात आले आहे. यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणारे कंपनीचे प्रमुख, एजंट जिल्हा सोडून पसार होत पुणे, मुंबईला गेले आहेत. शेअर्स मार्केटच्या माध्यमातून एसएम ग्लोबल कंपनीची स्थापना करून, लोकांना रकमेवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सांगलीवाडी येथील मिलिंद गाडवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात पुणे येथेही गुन्हा दाखल आहे. वेफाच्या सहा संचालकांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात, तर एसएम ग्लोबल कंपनीच्या दोन संचालकांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कंपनीचे नाव बदलून तेच लोक फसवणूक करण्याचा फंडा वापरत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गुंतवणूक दारांच्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे नेते तांबोळी म्हणाले, तासगाव तालुक्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यात आणि कर्नाटकात ही फसवणूक झाली आहे. साखळी पद्धतीने जादा परतावा देण्याच्या अमिषाने गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कित्येक कोटी रुपयावर ही फसवणूक असण्याची शक्यता आहे. या संदर्भात आम्ही गुंतवणूकदारांची लवकरच सांगलीत बैठक घेणार आहे. त्यांच्यातील शिष्टमंडळ तयार करून फसवणुकीसंदर्भात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन वस्तूस्थिती सांगणार आहे. दरम्यान, आज अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांच्या आर्थिक शाखेत निरीक्षक देशमुख यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांना गुंतवणुकीची कागदपत्र घेऊन सोमवारी येण्यास सांगितले आहे. जत तालुक्यातही अनेकांची फसवणूक झाल्याचे पुढे आले असून यात काही डॉक्टर, शिक्षक सुत्रधार असल्याचे पुढे येत आहे.
तक्रारीसाठी पुढे यावे
फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख नारायण देशमुख यांनी सांगितले.