समडोळी : पुढारी वृत्तसेवा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत बदलेल्या गटरचनेमुळे मिरज पश्चिम भागातील प्रमुख राजकीय पक्ष व गटातील स्थानिक नेते, समर्थकांची भूमिका निर्णायक ठरणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती गणांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे. मिरज पश्चिम भागामध्ये सुरुवातीपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींचे कमी अधिक प्राबल्य आहे. तत्कालीन सांगली विधानसभा व सांगली लोकसभा मतदारसंघातील मिरज पश्चिम भागातील काही गावे आता इस्लामपूर विधानसभा व इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात जोडली आहेत.
जलसंपदामंत्री जयंत पाटील, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे नेते निशिकांत भोसले-पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना मानणारा मोठा गट या भागात कार्यरत आहे.
समडोळी जि. प. गटात समडोळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, बाजार समिती माजी सभापती वैभव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), माजी सरपंच महावीर चव्हाण (भाजप), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष संजय बेले, कसबेडिग्रज येथे आनंदराव नलवडे, भरत देशमुख, मोहनराव देशमुख, अण्णासाहेब सायमोते, रामचंद्र मासाळ (राष्ट्रवादी काँग्रेस) माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले (काँग्रेस), विनायक जाधव (रयत क्रांती) मौजे डिग्रजमध्ये जयंत पाटील यांचे निष्ठावंत सहकारी उद्योजक भालचंद्र पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुमार पाटील, नाथगोंडा पाटील (भाजप) आदींचे स्थानिक राजकारणामध्ये वजन आहे.
जलसंपदामंत्री पाटील यांनी मिरज पश्चिम भागात केलेली विकासकामे, कार्यकर्त्यांना दिलेली संधी, राजारामबापू कारखाना, सर्वोदय कारखाना, वसंतदादा साखर कारखान्याच्या माध्यमातून मंत्री पाटील, युवा नेते विशाल पाटील, ना. पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील, माजी आमदार संभाजी पवार यांचे सुपुत्र पृथ्वीराज पवार यांना मानणारा गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या भागांमध्ये असलेले वलय, निशिकांत भोसले – पाटील, राहुल महाडिक यांनी या भागात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.