मिरज : फुकट आंबा खाण्यास विरोध केल्याने फळविक्रेत्यास मारहाण
मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज-पंढरपूर रस्त्यावर फळ विक्री करणार्या दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी राजू मनोहर गायकवाड यांनी अज्ञाताविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजू गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार, ते पंढरपूर रस्त्यावर एका बँकेसमोर टेम्पोमधून फळविक्री करीत होते. त्यावेळी अज्ञात व्यक्ती सोमवारी दुपारी टेम्पोजवळ आला. त्याने गायकवाड यांच्या परवानगीशिवाय आंबा घेऊन खाल्ला. त्यावेळी गायकवाड यांनी “आंबे महाग आहेत, का खाल्ला” अशी विचारणा केली. त्यावेळी अज्ञाताने “तू कोण विचारणार?, खालेला आंबा या जागेचे भाडे आहे असे समज” असे म्हणून गायकवाड यांना लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच राजू गायकवाड यांचा मुलगा आदित्य याला देखील पाईपने मारहाण केली. त्यानंतर गल्ल्यातून दोन हजार रुपये घेऊन पोबारा केला.