मिरज: धुळवडीतून पुन्हा मारामारी
मिरज पुढारी वृत्तसेवा : शहरातील गोसावी समाजात धुळवडीतून सलग दुसर्या दिवशीही मारामारी झाली. पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणातून चाकू, दगड, काठ्या आणि लोखंडी रॉडने हाणामारी झाली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.
मारामारी प्रकरणी युवराज भीमराव गोसावी (वय 38) आणि शारदा आकाश गोसावी (वय 26) यांनी पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दिल्या आहेत. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज गोसावी याच्या फिर्यादीनुसार, त्यांचे जावई नेताजी आताजी गोसावी यांनी पोलिसात फिर्याद दिल्याच्या कारणातून धुळवडी दिवशी आकाश सुरेश गोसावी, आदित्य शिवाजी गोसावी, राहुल राजेश गोसावी आणि कार्तिक शिवाजी गोसावी या चौघांनी काठी व रॉडने मारहाण करून जखमी केले होते. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी अनिता गोसावी, बहीण विमल भीमराव गोसावी, सुमन अनिल जाधव, मंगल गणेश गोसावी या महिलांनाही मारहाण करण्यात आली होती.
शारदा आकाश गोसावी यांच्या फिर्यादीनुसार, युवराज भीमराव गोसावी, सुनील भीमराव गोसावी, कुणाल युवराज गोसावी आणि राहुल शिवाजी जाधव यांनी संगनमत करून शिवीगाळ व दमदाटी केली.
शारदा यांचे पती आकाश हे भांडण सोडविण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनाही ढकलून देऊन त्यांच्या हातावर चाकूसारख्या हत्याराने मारून जखमी केले. अनुसया शंकर गोसावी यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांना देखील मारहाण करण्यात आली. याबाबत परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.