राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाने उमेदवारी देऊन राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचं सोने करुन दाखविणार आणि जिल्ह्यासह कोकणच्या विकासाला हातभार लावणार, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, माजी आ. धैर्यशील पाटील यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली. राज्यसभेच्या दोन रिक्त जागांसाठी ३ सप्टेंबरला निवडणूक होत आहे. यामधील एका जागेवर भाजपने पेणचे माजी आ. धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बुधवारी धैर्यशील पाटील यांनी मुंबईत विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आ. भरत गोगावले, आ. रवी पाटील, महेश बालदी, अॅड. निलिमा पाटील यांच्यासह रायगडमधील भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
उमेदवारी मिळाल्याचे समाधान पाटील यांच्या चेहऱ्यावर जाणवत होते. पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारी देऊन माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. पण राजकीय स्थितीमुळे ते शक्य झाले नाही. पण लगेचच राज्यसभेसाठी उमेदवारी देत राष्ट्रीय स्तरावरच काम करण्याची संधी मला देण्यात आली आहे. याचा मनोमन आनंद मला होत आहे. निवडणुकीत माझा विजय निश्चितच आहे, असा दावाही त्यांनी केला.
राज्यसभा हे संसदेचे सर्वोच्च सभागृह आहे. येथे आता काम करताना व्यापक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवत काम करण्याचे भान ठेवावे लागणार आहे. दोन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत काम करण्याची संधी मला यापूर्वी शेकापच्या माध्यमातून मिळाली होती. त्यामुळे संसदीय आयुधांचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा हे माहिती झालेले आहे. आता कार्यक्षेत्र विस्तारलेले असणार आहे. पक्षाचा, विभागाचा विचार करुन रायगडात केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी आणणे हेच आपले ध्येय असणार आहे, असे धैर्यशील पाटील यांनी सांगीतले.