

जयंत धुळप
रायगड : कोकण विभागीय टंचाई कृती आराखडा 2026 नुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांत सद्यस्थितीत 1,020 गावे आणि 3,010 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष असून, वाढत्या उन्हाळ्यासह या गाव-वाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. यंदा टंचाईची तीव्रता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. कोकणाला निसर्गाची विपूल पावसाची इतकी मोठी नैसर्गीक देणगी लाभूनही कोकणी माणूस तहानलेला राहतो, हे नियोजनशून्यतेचे उदाहरण आहे. याच वास्तवातून आता ‘दरवर्षी आभाळ फाटतंय, पण कोकणचा रांजण कोरडाच’ अशी म्हण ग्रामीण भागात रूढ झाली आहे.
कोकण आणि पाऊस यांचे नैसर्गिक असे अतूट नाते आहे. दरवर्षी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कोसळणारा वरुणराजा कोकणच्या डोंगरदर्या हिरव्यागार करतो, नद्यांना पूर येतो आणि धबधबे कोसळतात. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून अतिवृष्टीमुळे भूस्खलन (लॅन्डस्लाईडस्) आपत्तीही कोकण अनुभवतो आहे. कोकणातील या धो-धो पडणार्या पावसाचा निसर्गोत्सव जेमतेम तीन ते साडेतीन महिन्यांचाच ठरतो. पावसाळा संपला की, अवघ्या तीन महिन्यांतच ‘धो-धो’ पाऊस पडणार्या याच भूमीची तहान वाढू लागते. फेब्रुवारी महिना सरता सरता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चारही जिल्ह्यांत पाण्याचे टँकर धावू लागतात.
एप्रिल-मे महिन्यात गंभीर परिस्थिती उद्भवणार
मार्च 2026 च्या प्रशासनाच्या अहवालानुसार, कोकण विभागात यंदा टंचाईची तीव्रता गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत 10 ते 15 टक्क्यांनी वाढली आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 2026 मधील पाणीटंचाईची स्थिती चिंताजनक बनत आहे. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात गंभीर उद्भवणार आहे. कोकण विभागीय आयुक्तस्तरावर तयार करण्यात आलेल्या प्रशासकीय टंचाई कृती आराखडा 2026 नुसार कोकणातील या चार जिल्ह्यात यंदा 1 हजार 20 गावे आणि 3 हजार 10 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष जाणवणार आहे.