खाडीपट्टा, रघुनाथ भागवत
गुरुवारी (दि.25) झालेल्या अतिवृष्टीमुळे खाडीपट्टयातील जनजीवन विस्कळीत होऊन सर्वत्र पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. लोअर तुडील नामावलेकोंड या दरडग्रस्त गावातील दगडू रामचंद्र उमासरे यांच्या घराची भिंत कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसून परिवारातील ५ सदस्य घरामध्ये राहत होते. यानंतर उमासरे यांच्या मदतीला गावातील लोकांनी येवून स्थलांतर करण्यात आले, असल्याची माहिती ग्रामस्थ संतोष तांबे यांनी दिली.
दुर्घटनाग्रस्त घरातील दगडू उमासरे हे पॅरालेसीस आजाराने त्रस्त आहेत. घटना घडल्यानंतर तात्काळ घरातून बाहेर पडणे त्यांना मुश्किल गेले, मात्र ग्रामस्थांनी घडनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीला धावून जाऊन तात्काळ बाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. सुदैवाने घरातील ५ जणांचा परिवार सुरक्षित असून तात्काळ ग्रामस्थांनी धाव घेत घरातील सर्व ५ ही जणांना बाहेर काढून स्थलांतर केले आहे. मात्र अतिवृष्टीने हे घर जमीनदोस्त होईल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, घडलेल्या घटनेला जबाबदार सरकार असून गेल्यावर्षी तब्बल १ कोटी ६६ लाख रुपयाची निधी पावसाळी निवारा शेड साठी आलेले असताना त्याचा काहीच थांगपत्ता नाही. तसेच अतिवृष्टी होत असताना आम्हाला सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी कोणत्याही सरकार हालचाली झाल्या नाहीत ? ही बेजबाबदारी आमच्या बाबतीत होत असून याचा आम्ही निषेध व्यक्त करून आम्हाला योग्य न्याय मिळावा आणि आमचे तात्काळ स्थलांतर व्हावे अशी मागणी संतोष तांबे यांनी दैनिक पुढारी जवळ बोलताना व्यक्त केली.