

पेण : स्वप्नील पाटील
जिद्द, चिकाटी आणि आई-वडिलांच्या कष्टाचे सोनं करत पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्यापाठोपाठ आता त्यांच्या बहिणीनेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. रसाळ कुटुंबातील बहीण ऋतुजा रसाळ यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन दुय्यम निबंधक तथा राज्य कर निरीक्षक या पदी मजल मारली आहे. रक्षाबंधन आणि राखी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भाऊ-बहिणीने एकमेकांना यशरुपी अनोखी भेट दिल्याने रसाळ कुटुंबावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अशिक्षित आई-वडील, पण शिक्षणाची अखंड ध्यास
रसाळ कुटुंबाची पार्श्वभूमी अत्यंत सामान्य आणि ग्रामीण भागातील आहे. नवनाथ आणि ऋतुजा यांचे आई-वडील अशिक्षित असूनही त्यांनी मुलांना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतला होता. आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी आणि आई-वडिलांनी घेतलेले कष्ट डोळ्यांसमोर ठेवून या दोन्ही भावंडांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करून दाखवले.
भावाच्या प्रेरणेतून बहिणीची गगनभरारी
पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सरसाबाई आनंदा रसाळ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २० मे २०१५ रोजी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती. सध्या ते पेण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. भावाच्या या यशातून प्रेरणा घेत ऋतुजा अंजनाबाई संपत रसाळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात कठोर मेहनत घेतली.
अखेर १४ ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी दुय्यम निबंधक व राज्य कर निरीक्षक पदावर मोहर उमटवली. रक्षाबंधनाला केवळ राखी आणि मिठाईपुरते मर्यादित न ठेवता, शिक्षणाच्या आणि यशाच्या माध्यमातून एकमेकांना दिलेली ही 'ओवाळणी' आणि 'भेट' प्रशासकीय वर्तुळात तसेच सामाजिक क्षेत्रात आदर्शाचा वस्तुपाठ ठरत आहे.
कर्तृत्वाची 'अनोखी ओवाळणी'!
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत २० मे २०१५ रोजी नवनाथ रसाळ हे एमपीएससी उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक बनले. तर भावाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ऋतुजा रसाळ यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी एमपीएससी परीक्षा फत्ते करत दुय्यम निबंधक व राज्य कर निरीक्षक पदाला गवसणी घातली. एक भाऊ पोलीस दलात तर बहीण महसूल कर प्रशासनात दाखल झाल्याने या भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याची आणि कर्तृत्वाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.