

श्रीवर्धन शहर : श्रीवर्धन तालुक्यात यंदाच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून कालपर्यंत एकूण ८१२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे तुडुंब वाहत असून सर्वत्र पावसाचे समाधानकारक चित्र दिसत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीतही श्रीवर्धन शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारे रानवली धरण अपेक्षेप्रमाणे भरले नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कालपर्यंत धरणाच्या पाण्याच्या पातळीत अवघी चार मीटरची वाढ झाली आहे. झालेल्या पावसाच्या प्रमाणाचा विचार करता धरणातील पाणीसाठा किमान आठ मीटरपर्यंत वाढणे अपेक्षित असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे धरणात पाणी अपेक्षेपेक्षा कमी का साचत आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, यावर्षी उन्हाळ्यात रानवली धरणाने तळ गाठला होता. त्याचबरोबर हवामान खात्याने दोन ते तीन महिन्यांपूर्वीच यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत संबंधित विभागाने धरणात अधिकाधिक पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, डोंगरदऱ्यांमधून वाहणारे पाणी धरणात वळविण्यासाठी कोणताही प्रभावी स्त्रोत विकसित करण्यात आलेला नसल्याचे दिसून येत आहे.
धरणाकडे पाणी आणणाऱ्या पारंपरिक पाटांचीही योग्य देखभाल करण्यात आलेली नाही. या पाटाची शेवटची मोठी साफसफाई २०१२ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर या महत्त्वाच्या जलमार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी वाया जात असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे
केवळ स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेने मागणी करण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने स्वतःहून पुढाकार घेऊन दीर्घकालीन जलनियोजन राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी धरणातील साठा अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने सर्वेक्षण करून धरणाकडे येणारे नैसर्गिक जलमार्ग, पारंपरिक पाट आणि पाण्याचे स्त्रोत विकसित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.