मुरूड शहर : प्रकाश सद्रे रायगडात भाताचे पीक उत्तम असले तरी पुढच्या तरातत कापणीसाठी भात तयार होईपर्यंत पावसाच्या पाण्याची आवश्यकता आहे असे मत मुरूड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. हवामान खात्याने देखील दिलेल्या माहीती नुसार राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असून रायगड जिल्ह्याचा देखील समावेश आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन महाराष्ट्रा कडे सरकत असल्याने शनिवार पासून पावसाचे अनुकूल वातावरण तयार होत आहे. सोमवार पासून पावसाची तीव्रता वाढेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.
वाणदे गावचे जेष्ठ शेतकरी तुकाराम पाटील यांनी सांगितले की सध्या काही ठिकाणी भात पिकावर खोड किड्याचा प्रादुर्भाव झाला असून फवारणी करावी लागेल असे वाटते. तहसील सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार मुरूड तालुक्यात आता पर्यंत २८०९ मिमी पाऊस पडला आहे. शिघ्र गावचे जेष्ठ शेतकरी रघुनाथ माळी यांनी सांगितले की, उखारू भात पीक अद्याप तयार झालेले दिसून येत नाही. पिकाला अजूनही पावसाची गरज आहे. भात पीक तयार होण्यासाठी भरपूर वेळ आहे.
तापमान वाढते असल्याने आगामी काही दिवसात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडेल असे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे खारआंबोली, शिघ्र, विहर, वावडुंगी, तेलवडे भागातील शेतकऱ्यांनी शनिवारी (२१ सप्टेंबर) रोजी सांगितले. सध्या तालुक्यातील तापमान २८ ते २९ सेल्सियस आहे.
मुरूड तालुक्यात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मुरूड तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांनी सांगितले की मुरूड तालुक्यात ३२१० हेक्टर जमिनीवर भात लागवड केली जाते. तालुक्यात यंदा उत्तम भात पीक आले आहे. सुवर्णा, वाडा कोलम, जया, जोकर असा प्रकारातील भात जातीचे पीक लावले जाते. बोर्ली मांडला पंचक्रोशीत अधिक प्रमाणात भात पीक घेतले जाते. बदलते हवामान किंवा अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यासाठी शेतकरी बांधवांनी पीक विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विमा काढावा.