माणगाव तालुक्याला सोमवारी अचानक दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अक्षरशा झोडपले, माणगाव मध्ये चार तास वीज पुरवठा बंद होता. तर निजामपूर भागात तब्बल सहा तासांनी वीस पुरवठा सुरू झाला. सोमवारी सकाळपासूनच उष्णतेमुळे नागरिक घायाळ झाले होते. दुपारी दोन वाजता निजामपूर पासून बारा किमी अंतरावर असणार्या जोर गावात व डोंगर भागातील परिसरात अचानक दुपारी दोन वाजेपासून पाऊस सुरू झाला आणि हा हा म्हणता डोंगर भागातून अचानक पाण्याचा लोंढा आल्याने नागरिक भयभीत झाले होते. जोर गावाजवळ वाहणारी नदी दुथडी भरून वाहू लागली.
सुमारे तीन तास पडलेल्या या अतिवृष्टीमुळे जोर गावाच्या परिसराला ढगफुटी सुदृश्य परिस्थितीचे स्वरूप झाले होते. या गावातील नदीला महापूर आला तसेच शेतामध्ये पाणी घुसले त्यामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे. डोंगर भागातून आलेले या पुराच्या लोंढ्यामुळे वाहने ही वाहून गेली आहेत. तब्बल तीन तास पडलेले या पावसामुळे शेती व काही वाहनांचे नुकसान केले आहे. त्यानंतर नदीला उथळ भाग असल्याने पूर आता हळूहळू ओसरू लागला आहे. जोर या गावातील नागरिक सुभाष कुणके यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, आमच्या गावात यापूर्वी कधीही एवढा पाऊस पडला नाही. एवढा भयानक पाऊस अचानक पडला त्यामुळे ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही वाहनांचे पुरामध्ये नुकसान झाले तर अनेकांची शेतीत पुराचे पाणी घुसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.