

BJP Raigad independent group
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या १५ नवनिर्वाचित सदस्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र गटाची नोंदणी केली आहे. त्यानंतर अलिबाग येथील भाजप कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत पेण येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. याबाबतची माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.
भाजपच्या या निर्णयामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणांबाबत नवा राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती झाली होती. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ सदस्य विजयी झाले असले, तरी दोन्ही पक्षांनी संयुक्त गट नोंदणी न करता स्वतंत्र गट नोंदणीची भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप अधिकृत गट नोंदणी केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनीही गट नोंदणी केलेली नसल्याने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होण्यापूर्वीच राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या आहेत. सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेत नेमकी कोणाची सत्ता स्थापन होणार, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. स्वतंत्र गट नोंदणीमुळे भाजपने आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मानले जात असून, पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे सर्व नवनिर्वाचित सदस्य एकत्रितपणे काम करतील. वैकोठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विकासकामांना गती देण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.