

जेएनपीए ः विठ्ठल ममताबादे
उरण शहरातील नागरी सुविधा बाबत उरण नगरपालिकेच्या प्रशासकीय उदासीनतेमुळे शहराला समस्या भेडसावत आहेत.यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी 15 ऑगस्ट रोजी शिष्टमंडळासमवेत तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांची भेट घेऊन त्यांना तक्रार निवेदन देवून शहरातील समस्यांचा पाढाच वाचला.
उरण शहर अनेक समस्यांनी ग्रासले आहे. शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर आहे.आनंद नगर ते राजपाल नाका कोट नाका ते विवेकानंद चौक पर्यंत वाहतूक कोंडी होत असते. शहरात पाच मिनिटांच्या प्रवासालां अर्धा तास, एक तास लागतो. शहराच्या नागरिकांना चालणे मुश्किल होत आहे. उरण रेल्वे स्टेशन मधून कोट नाका या मार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात होते याचा ताण शहरावर पडतो.यासाठी नवीन शेवा गावाकडून रेल्वे स्टेशन कडे मार्गीका तयार करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोटा नाका बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे.उरण शहरांमध्ये होणारा रविवारचा बाजार व पिरवाडी समुद्रकिनारी जाण्यासाठी वाहने यामुळे चार फाटा व आनंद नगर परिसर ट्रॅफिक जाम होते. याचे नियमन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. शहरामध्ये पावसाळा असूनही पाणी समस्या यामुळे नागरिक त्रस्त आहेत सध्या शहरांमध्ये जुन्या इमारतीचे री डेव्हलपमेंट होत आहे. आनंद नगर कामगार वसाहत कामठा परिसर यामध्ये इमारतीचे री डेव्हलपमेंट होत आहे.अनेक नवीन इमारती उभ्या राहत आहेत.यातील बांधकाम साहित्य रस्त्यावरच राहते बांधकाम साहित्य मुळे गटारे तुंबली आहेत. तसेच आवाजाचा त्रास यामुळे नागरिक हैराण होत आहेत.
वाढती लोकसंख्या पाहता एमआयडीसी कडून नगरपालिका क्षेत्रात पाण्याचा दाब क्षमता वाढून घेणे आवश्यक आहे.उरण शहरात आगीचे प्रकार होत असताना स्वतःची अशी अग्निशमन केंद्र उभारावे जेणेकरून आग ताबडतोब आटोक्यात येइल. शहरांमध्ये कचरा वेळीच उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.कीटकनाशकांची फवारणी होत नसल्याने मोठ्या प्रमाणात मच्छरची पैदास होत आहे.त्यासाठी कीटकनाशकांची फवारणी होणे अत्यावश्यक आहे.
वाचकांसाठी आवश्यक असलेले माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय सुसज्ज जागेत हलवावे. शहरातील हातगाड्या व फेरीवाले यांसाठी फेरीवाला झोन तयार करावा त्यांना नगरपालिकेने जागा द्यावी.त्यामुळे शहरातील पदपथांचा वरील होणारा ताण कमी होऊन नागरिकांना चालणे सुलभ होईल.माजी उपनगराध्यक्ष नाहीदा ठाकूर,माजी नगरसेविका लता पाटील,नयना पाटील, दीपा कोळी, नारायण पाटील, गजानन भोईर आदि यावेळी उपस्थित होते. या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्या सोडविण्याचे आश्वासन तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले.