

रायगड ः रायगड जिल्ह्यात 8 व 9 मे रोजी झालेल्या वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या दोन दिवसांच्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकुण 899 घरांचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या सूरु असून, पंचनामे पूर्ण होताच नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील विविध तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यामध्ये सुधागड तालुक्यात 428 अंशतः पक्की आणि 42 अंशतः कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. तसेच 5 गोठे आणि 3 पोल्ट्री शेड्सची पडझड झाली आहे. निलेश गणपत तळकर यांच्या पोल्ट्री फार्ममधील दीड ते दोन हजार कोंबड्या दगावल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
माणगाव तालुक्यात 215 अंशतः कच्च्या घरांचे नुकसान झाले असून पोलादपूरमध्ये 111 कच्ची घरे, 2 गोठे आणि 9 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महाड मध्ये 50 घरे, खालापूर मध्ये 30 घरे, म्हसळा 10 घरे आणि कर्जत मध्ये 13 घरे, 3 गोठे असे नुकसान झाले आहे. या भागांतही घरांची अंशतः पडझड झाली आहे.
मदत कार्यास सुरुवात
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत बाधित नागरिकांना तातडीने मदत वितरित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. प्रशासन आता पुनर्वसन आणि मदत कार्यावर भर देत आहे, असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.