खालापूर : ट्रेकिंगसाठी माणिक गडावर गेलेल्या सव्वीसपैकी पाच तरूणांची ताटातूट होवून भरकटल्यानंतर रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर, पोलीस हवालदार मंगेश लांगी, पोलीस शिपाई राहूल भडाळे आणि बाळासाहेब तिडके देवदूत म्हणून धावून गेल्याने पाच तासानंतर तरुणांची सुटका झाली.
मुंबईतील भांडूप, घाटकोपर येथील सव्वीस जणांचा ग्रुप वाशिवली येथील माणिक गडावर ट्रेकिंग साठीसाठी मंगळवारी आले होते. कोणताही वाटाड्या न घेता
सकाळी दहा वाजता गड चढण्यास सुरवात केली. उत्साहाचे भरात पुढे असलेले श्रेयस मनीष देड, किरण प्रकाश होना, यशपाल मोमाया, चिराग नयेश शहा, आणि रीदय मयूर ठक्कर (सव मुंबई) हे वाट चुकल्याने भरकटले. गडावर मोबाईलला रेंज नसल्याने भरकटलेल्या पाच जणांचा ग्रुपशी संपर्क तुटला.
ग्रुपमधील काही, तरुणांनी मदतीसाठी ११२ क्रमांकावर फोन करून ट्रेकिंग करता आलेले ५ पर्यटक हे पोलीस ठाणे हद्दीतील माणिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात भरकटलेले असलेबाबत कळवले. सदरचा संपर्क नियंत्रण कक्ष अलिबाग यांच्याशी दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला. अलिबाग नियंत्रण कक्षातून तातडीने रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना माहिती देत मदतीसाठी जाण्याचे सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक बांगर यांनी तातडीने पोलीस कर्मचारी मंगेश लांगी, राहुल भडाले, बाळासाहेब तिडके यांना तात्काळ माणिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात रवाना केले. पोलीस पथकाने वाशिवली ठाकूरवाडी येथील माहितगार इसमास सोबत घेऊन जाऊन माणिकगड किल्ल्याचे डोंगराळ परिसरात शोध घेण्यासाठी सुरवात केली. संध्याकाळी भरकटलेल्या पाच तरुणाना शोधण्यात पोलीसांना यश आले.