उरण : भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर साकव केव्हाही पडून रहदारी करणार्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतो अशी भीती भेडखळ गावातील रहिवासी व्यक्त करत आहेत.
भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या ग्रामपंचायत फंडातून, सिडको तसेच इतर शासकीय योजनेच्या माध्यमातून विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. परंतु रहिवाशांच्या रहदारीसाठी महत्वाचा असलेल्या गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष केंद्रित करण्यास कोणाला ही वेळ मिळत नाही. त्यामुळे साकवाचा पाया हळूहळू कमकुवत होत चालला आहे. ही अशीच परिस्थिती राहिली तर रात्री अपरात्री सदर साकव पडून रहदारी करणार्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण करु शकतो अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी तातडीच्या उपाययोजनासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.
या अगोदर फुंडे व धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील साकव पडून एका कामगारांचा तसेच मासेमारीसाठी गेलेल्या आदिवाशी बांधवांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याची पुनरावृत्ती घडू नये यासाठी सदर साकवाचे दुरुस्तीचे किंवा नव्याने काम हाती घेण्यात यावे.
शिवाजी ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, भेंडखळ