

रायगड : भिलजी-रामराज येथील जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधून दहाहून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु, अद्यापपर्यंत त्या पुलाचा वापर करण्यात आला नाही. या पुलासाठी करण्यात आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. अजूनही जुन्या पुलाचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत.
अलिबाग तालुक्यातील रामराज ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखळी जाते. दर शनिवारी आठवड्याचा बाजार भरला जातो. कुदे, सुडकोली, नांगरवाडी, उमटे, बोरघर, भिलजी, बापळे, फणसापूर, चिंचोटी, दिवीपारंगी, महाजने, बेलोशी, वावे, मल्याण या गावांसह महाजने दिवीवाडी, सत्यवाडी, होन्डावाडी, धनगरवाडी आदी वाड्यांमधील नागरिकांची या बाजारात खरेदीसाठी अलोट गर्दी होते. अलिबाग, रोह्याकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी रामराज हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते.
रामराजकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ कायमच असते. भिलजी बोरघर आणि रामराज येथील जुन्या पुलाचे कठडे तुटल्याने त्या जागी नवीन पूल बांधण्याची मागणी त्यावेळी झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत २०१५ पूर्वी नवीन पूल बांधण्यात आला. जुन्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. पावसाळ्यात नदीला पूर येत असल्याने पुलावरून पाणी जाते. त्यामुळे पुलाची उंचीदेखील वाढवण्यात आली होती. नवीन पूल बांधल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, त्यांच्या आनंदाला विरजण पडले.
आता नवीन पुलाला झुडपांनी विळखा घातला आहे.
ठिकठिकाणी गवत वाढले आहे. लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल बेवारसस्थितीत आहे. त्याचा वापर होत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जात आहे. तपासणी करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
योग्य नियोजनाअभावी वापर नाही
बांधलेल्या पुलाचा अद्यापपर्यंत वापर करण्यात आला नाही. जुन्या पुलावरून वाहनांची वर्दळ होत आहे. त्यावेळी बांधण्यात आलेल्या पुलाचे योग्य नियोजन नसल्याने तो पूल वाहतुकीस मोकळा करण्यात आला नाही.