

रोहे : मध्य रेल्वे आरपीएफ पथकाने जीआरपीच्या समन्वयाने मुंबई विभागातील इगतपुरी - कसारा घाट विभागात कार्यरत असलेल्या चोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आणि सोलापूर विभागात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
मंगला एक्सप्रेस प्रकरण
मध्य रेल्वे आरपीएफ टीमने इगतपुरी-कसारा घाट विभागात चोरीच्या अनेक घटनांच्या अहवालांवर आधारित या घटनांना आळा घालण्यासाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी कसारा आणि इगतपुरी येथील आरपीएफ कर्मचारी आणि गुन्हे प्रतिबंधक व शोध पथक (सीपीडीएस) आणि जीआरपी/इगतपुरी यांचा समावेश असलेले संयुक्त कार्यदल स्थापन केले. या पथकाने घाट आणि लगतच्या डोंगराळ भागात सक्रिय असलेल्या संशयास्पद व्यक्तींवर सातत्याने गुप्तपणे पाळत ठेवली.
दिनांक १२.०१.२०२६ रोजी, घाट विभागात पाळत ठेवताना, आरपीएफ पथकाला संशयास्पद हालचाल आढळली आणि ट्रेन क्रमांक 12618 अप एर्नाकुलम- हजरत निजामुद्दीन मंगला एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या सामानाची चोरी केल्याबद्दल दोन जणांना रंगेहाथ पकडले. रवींद्र नामदेव धोगंडे, वय २६, रहिवासी खडवली आणि करण भीमराव भालेराव, वय १९, रहिवासी आसनगाव यांना अटक करण्यात आली. चौकशीत कल्पेश कानू आरे, वय २४, नावाच्या एक साथीदाराला बलवंडी येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आले.
चेन्नई - एकतानगर सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रकरण
ट्रेन क्रमांक 20919 दिनांक १७.०१.२०२६ रोजी चेन्नई- एकतानगर सुपरफास्ट एक्सप्रेसवर गुन्हेगारी प्रतिबंधक कर्तव्यावर एक सहाय्यक उपनिरीक्षक आणि ४ आरपीएफ कर्मचारी आणि २ जीआरपी कर्मचारी यांचा समावेश असलेला आरपीएफ पथक तैनात करण्यात आला होता.
जवळपास ०५:३० वाजता, ट्रेन दुधनी स्टेशनवर असताना, टीमला एक संशयास्पद व्यक्ती आरक्षित डब्यातून जनरल डब्याकडे धावताना दिसली. टीमने त्या व्यक्तीला अडवले आणि चौकशीदरम्यान बेल्लारी जिल्हा कर्नाटक येथील रहिवासी असलेल्या गोपीकृष्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरोपीने तीन मोबाईल फोन आणि ५,१०० रुपयांची रोकड चोरल्याची कबुली दिली. त्याच्या तपासणीत अंदाजे १.५२ लाख किमतीचे मोबाईल फोन (आय-फोनसह), मनगटी घड्याळ, पॉवर बँक, चार्जर आणि इअरफोन्स अशा चोरीच्या वस्तू आढळल्या.
आरोपीला पुढील कारवाईसाठी जीआरपी/सोलापूर यांच्याकडे सोपवण्यात आले. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम ३०५ आणि ३०५(सी) आणि कलम १४७ अंतर्गत एसीआर क्रमांक ०२/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
मध्य रेल्वे या प्रदेशात प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपीच्या समन्वित प्रयत्नांचे कौतुक करते. प्रवाशांना सतर्क राहण्याचा आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्याचा किंवा मदतीसाठी १३९ वर संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात येत आहे.