रायगड : कोकणातील आंबा-काजू फळबागातील शेतकर्यांची विमा रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने कृषी सचिव यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र शासन हवामानावर आधारित फळपिक विमा योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबवित आहे. कोकणातील आंबा व काजू या फळपिकांचा या योजनेत समावेश आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील फळबाग उत्पादक शेतकर्यांनी स्वहिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे. या वर्षी (2023-2024) सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानातील वाढ या सारख्या आपत्तींमुळे सर्व जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी विमा परतावा मिळणेचे प्रतिक्षेत आहेत. परंतु जोखीम कालावधी संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी संपला असताना देखील शेतकर्यांना विमा परतावा मिळाला नाही. ही विमा परताव्याची हक्काची रक्कम लवकरात लवकर मिळावी अशा आषयाचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघातर्फे संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी राज्याच्या कृषी सचिव जयश्री भोज यांना मंत्रालयात सादर केले.
कोकणात जून ते ऑगस्ट या कालावधीत फळबागेच्या मशागतीचे काम केले जाते. किमान या कालावधीत तरी शेतकर्यांना पिक विमा मिळणे गरजेचे होते परंतु आता दसरा सणापूर्वी तरी विम्याचे पैसे मिळावेत असेही चंद्रकांत मोकल यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.