

रायगड : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून आज, ४ जुलै रोजी दिवसभरात जिल्ह्यात सरासरी १०३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून प्रशासनाने नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शनिवारी सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत जिल्ह्यातील ३ प्रमुख नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. रोहा तालुक्यातील अंबा नदी नागोठणे बंधारा येथे ८.०० मीटरची इशारा पातळी ओलांडून ८.९५ मीटरवर वाहत असून ती ९.०० मीटर या धोका पातळीच्या जवळ पोहोचली आहे. रोहा तालुक्यातीलच कुंडलिका नदी डोलवहाल बंधारा येथे २३.०० मीटरची इशारा पातळी ओलांडून २३.१० मीटरवर पोहोचली आहे.
खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीनेही मौजे लोहोप येथे २०.५० मीटरची इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान, महाडमधील सावित्री नदी, कर्जतची उल्हास नदी आणि पनवेलची गाढी नदी सध्या इशारा पातळीपेक्षा कमी अंतरावरून वाहत आहे. रात्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यांतील जगबुडी नदिने धोका पातळी ओलांडली आहे.
पोलादपूर तालुक्यात सात जणांचे स्थलांतर
पोलादपूर तालुक्यातील मौजे वडघर सोनारवाडी येथे दरड कोसळल्याने घरातील सात जणांना वडघर येथील अंगणवाडीत स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये गणपत महादेव कराडकर,रामचंद्र तुकाराम कराडकर, अनिल रामचंद्र कराडकर , हरी बंडू पाटणकर, लक्ष्मीबाई गणपत कराडकर , जयश्री रामचंद्र कराडकर , पार्वती मारुती पंडित या नागरिकांना अंगणवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. याशिवाय काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत.