

कोलाड, पुढारी वृत्तसेवा : रोहा तालुक्यातील गोवे येथील बागायतदार शेतकऱ्यांचे वणव्यामुळे लागलेल्या आगीत आंबा, काजुची कलमे जळून खाक झाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास हिरावून नेला आहे.
बुधवारी (दि.५) दुपारच्या सुमारास अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात वणव्याने रौद्ररूप धारण केले. बघता बघता सर्व बागेत वणवा पसरला आणि या वणव्यात आंबा, काजू, चिकू, फणसाची झाडे भस्मसात झाली. यामुळे आंब्याला बाजलेल्या कैऱ्या सुकून गेल्या. तर काही कैऱ्या गळून पडल्या.
गोवे येथील शेतकरी नंदा शिवराम वाफिळकर यांचे १० ते १२ आंबा व काजूची कलमाची झाडे तसेच निलेश चंद्रकांत वाफिळकर यांची आंबे, काजू, चिकू व फणसाची एकूण २५ ते ३० झाडे जळून खाक झाली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात येत आहे.