

Raigad Fort | Major accident averted at Raigad: Road closed for thousands of tourists!
नाते : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या ऐतिहासिक पायरी मार्गाचा काही भाग आज दुपारी महादरवाजाजवळ कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एक मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे गडावर सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत चित्तदरवाजा ते महादरवाजा हा पायरी मार्ग पर्यटकांसाठी आजचा दिवस हा बंद ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळी तात्पुरते लोखंडी पाईप लावून मार्ग सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, प्राधिकरण व बांधकाम विभागामार्फत तातडीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती: विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी याच मार्गाचा भाग आणि प्रसिद्ध 'खूबलढा' बुरुजाचा काही भाग कोसळण्याची घटना घडली होती. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कामांच्या गुणवत्तेबाबतच्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.
भविष्यातील धोका: हजारो शिवभक्त आणि पर्यटक याच मार्गाने गडावर ये-जा करतात. येथील पडणाऱ्या मोठ्या पावसाने हा मार्ग अधिक धोकादायक बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे हजारो शिवभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता या ऐतिहासिक मार्गाची सुरक्षित आणि दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.