

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया म्हणजे गडकिल्ले. महाराष्ट्रभर पसरलेले हे गडकिल्ले छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाले. आजही शिवकाळातील स्वराजाच्या उभारणीतील साक्षीदार असणाऱ्या या किल्त्यांचे महत्व आजही अबाधित आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अभेद्य गडांची महती वेगळी असून येथील देवताही सर्वसामान्यांचे आजही श्रद्धास्थान आहे. नवरात्री निमित्त जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमूख किल्ल्यांवरील देवी पुजेची प्रथा आणि परंपरा...
श्रीकृष्ण द. बाळ
महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक वर्षभर येतात. किल्ल्यावर आल्यावर रायगडाची गडदेवता असलेल्या श्री शिरकाई (शिर्काई) देवीचे दर्शन घेऊनच अनेकांचा गडाचा प्रवास सुरू होतो. रायगड किल्ल्यावर असणारे संपूर्ण पाषाणाचे शिरकाई देवीचे हे मंदिर अनेक शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या चहुबाजूला असलेली तटबंदी आजही टिकून
रायगड किल्ल्यावर गंगासागर तलावाकडून होळीच्या माळावर जाण्यासाठी थोडीशी चढण चढली की डाव्या बाजूला शिरकाई देवीचे छोटेसे मंदिर आहे. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडल्याचे सांगितले जाते. रायगडावर अनेक ऐतिहासिक ठिकाणे असून ती पाहण्यासाठी देशविदेशातून शिवप्रेमी येतात.
शिरकाई देवीची मूर्ती महिषासुरमर्दिनीच्या रूपातील आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी सभागृह अथवा गाभा नाही. गाभाऱ्याच्या ठिकाणी पाषाणरूपी देव्हारा बांधण्यात आला असून यामध्ये देवीची मूर्ती स्थानापन्न आहे. रायगडावर झालेल्या तोफांच्या हल्ल्यांमध्ये मंदिराचेही मोठे नुकसान झाले होते. परंतू तरीही मंदिराच्या चहुबाजूला असलेली तटबंदी आजही टिकून आहे. मंदिराच्या भोवताली दगडी भिंत असून पूर्व दिशेच्या मार्गाने आत प्रवेश करता येतो. मध्यभागी दगडी देव्हाऱ्यामध्ये अष्टपुजा महिषासुरमर्दिनीची शिरकाई देवीची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. आजही दररोज देवीची विधिवत पूजा केली जाते.
पेशवेकालीन दप्तरांमध्ये शिरकाई देवीच्या मंदिराची नोंद आढळते. आजही रायगडावर कोणताही कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गडदेवतेचे पूजन केले जाते. देवीचा गोंधळ केला जातो. रायगडावर श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री वाडेश्वर, श्री भवानी माता व श्री शिरकाई देवीची मंदिरे आहेत. यामध्ये शिरकाई देवीचे मंदिर अतिशय जुने मानले जाते. रायगडावर येणारा प्रत्येक शिवप्रेमी शिरकाई देवी पुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गडदेवता नावारूपास
हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरील श्री. शिरकाई देवीचा संदर्भ शिवकाळापूर्वीपासूनचा आढळून येत असला तरी किल्ले रायगडची गडदेवता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ती नावारूपास आली. रायगडावरील कोणत्याही कार्यक्रमाच्या प्रारंभापूर्वी श्री. शिरकाई देवीची विधिवत पूजा आणि गोंधळ घालण्याची प्रथा आजही कायम आहे. गडदेवता म्हणून पेशवेकालीन दप्तरांमध्ये देखील शिरकाई देवीची नोंद आहे. शिरकाई म्हणजे, महिषासुरमर्दिनीची अत्यंत रेखीव दगडी मूर्ती मंदिरामध्ये आहे. दररोज देवीची विधिवत पूजा करण्यात येते.
किल्ले रायगडावरील गंगासागर तलावाकडून नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर शिरकाई देवीचे मंदिर आहे. देवीच्या मंदिरासमोरच होळीचा माळ असून डाव्या बाजूस असलेला चौथरा शिरकाई देवीचा घरटा म्हणून ओळखला जातो. घरट्याच्या मागे उंबराच्या झाडांच्या दाटींमध्ये शिरकाई देवीचे मंदिर आहे. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता मानली जाते. शिर्के घराण्याची कुलदेवता म्हणून या देवीचे नाव शिरकाई पडले असावे, असा संदर्भ इतिहासात आहे.
अष्टभूजा असलेली देवीची मूर्ती
शिरकाई देवीची मूर्ती अष्टभूजा असलेली महिषासुरमर्दिनी भवानीची आहे. मूर्ती शिवपूर्वकालातील असावी, माधवराव पेशव्यांचे सरदार आपाजी हरी यांनी १७७३ मध्ये रायगड किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा प्रथम शिरकाई देवीचे दर्शन घेतल्याची, नव चंडिकायाग केल्याचा उल्लेख आहे. नवरात्रामध्ये घट उठल्यानंतर शिरकाई देवीचा गोंधळ होई. १७८६ मध्ये हा गोंधळ विधी बंद करण्यात आला.
गडाच्या माथ्यावर राजमहालाजवळ शिरकाई मातेचे मंदिर आहे. मोरे याच्याकडून जावळी सुभा स्वराज्यात आल्यावर रायगड शिवशाहीत आला. त्यावेळी गडावर अनेक कामे करण्यात आली. इमारती उभ्या राहिल्या त्याचवेळी शिरकाई देवीचे मंदिर बांधण्यात आले. शिवकाळात या मंदिराला अतिशय महत्वाचे स्थान होते. नंतरच्या काळात रायगड संकटात सापडला गडावर अनेक घडामोडी घडल्या; पण १७७३ नंतरच्या काळात अप्पाजी हरी याने रायगड पुन्हा ताब्यात घेतल्यापासून पेशवाईत गड पुन्हा नांदता झाला.
रायगडावरील प्रमुख देवता
आदीमाया माता शिरकाई ही रायगडावरील प्रमुख देवता आहे. १७७३ मध्ये सप्टेंबर महिन्यात इथे नवचंडीचा होम करण्यात आल्याचा उल्लेख दप्तरात सापडतो. देवीच्या खर्चास उत्पन्न लाऊन देण्यात येत असे. ८ आक्टोबर १७७५ मध्ये महाड येथून दोन चांदीचे मुखवटे शिरकाई देवीसाठी खास करुन घेऊन गडावर पाठवल्याची नोंद पहावयास मिळते.
नवरात्र उत्सव हा देवीचा मोठा उत्सव रायगडावर साजरा होत असे. नवरात्रात देवीचे घट बसत, सतत नऊ दिवस उत्सव साजरा होत असे. नंदादीप हरीकिर्तन नऊ दिवस गडावर चालत असे. किर्तनाचे कामगीरीवर बिरवाडी येथील योगी यांची नेमणूक होत असे. उत्सव काळात देवीजवळ दोन नातेकर उपाध्ये देवीच्या जपास नऊ दिवस अहोरात्र बसत असत. महाड येथून खास जिनगर देवीचे मखर सजविण्यासाठी कलाभूती वेगवेगळ्या रंगाचे विलायती कागद पताका घेऊन गडावर देवीचे मखर सजवून देत असे. त्याला सरकारांतून बिदागी मिळत असे.
दसऱ्याचे दिवशी देवीच्या पुढील भव्य सभामंडपात ब्राम्हण भोजन होत असे. रायगड परिसरांतील मान्यवर ब्राम्हण या भोजनास खास निमंत्रीत करत. पाचाडकर- जोशी देवीजवळ नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचत असत. नऊ दिवस राजघराण्यांतील स्त्रिया देवीची ओटी खणानारळाने भरत असत. देवीचा गोंधळ घालण्यासाठी महाड येथील ग्राम दैवत श्री. विरेश्वर महाराज या देवस्थानचा गोंधळी गडावर जाऊन गोंधळ घालत असे. त्याच प्रमाणे नाते येथील मातंग समाज्याचे गोंधळी मानकरी म्हणून आई माता शिरकाई देवीचा गोंधळ घालत असत.
देवी शिरकाई नवसास पावणारी भोसल्यांची पाठराखण होती
देवीच्या उत्सवांतील हरी किर्तनाची हरदासाची बिदागी प्रसाद मृदुंगाची कणीक, खोबरे, नारळ, विड्याची पाने, खारीक इत्यादी सर्व खर्च सरकारांतून होत असे. सन १७७० च्या नोंदीवरुन भाताचा दर एकखंडी भातास रुपये पंधरा होता. देवी शिरकाई नवसास पावणारी भोसल्यांची पाठराखण होती. म्हणून गडकरी मंडळीचा तिच्यावर जीव होता. वर्षभर शिरकाई देवीचे सण उत्सव साजरे होत. समोरील सभामंडप अपुरा पडत असे. उत्सवावेळी देवीस तोफांची सलामी देण्यात येत असे. देवीच्या सभा मंडपासमोर तोफ सजवलेली असे. गडावर अतिशय नावाजलेल्या तोफा होत्या. अचूक माऱ्याबद्दल त्या तोफांची ख्याती होती. रायगडावर गंगासागर, मुल्लांना, पेरुजंगी, भुजंग, रामचंडी, पदाणी, फत्तेलष्कर, फत्तेजंग सुंदर, रेकम, मुंगशी शिवप्रसाद गणेश, लंगडा कसाब, चांदणी भवानी, नागीण इत्यादी युद्धात नाम कमावलेल्या अचुक मारा करणाऱ्या तोफा होत्या. अप्पाजी हरी याने देवी जाखमाता बुरुजावर पहारा देणारी लंगडा कसाब ही तोफ मोठ्या प्रयत्नाने रायगडावर नेली.