मागील तीन ते चार वर्षापासून किल्ले रायगडावर झालेल्या दरड कोसळण्याच्या तसेच दोन दिवसांपूर्वीच्या ढगफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगड संदर्भात या विविध समस्या भविष्यकाळात होऊ नयेत यासाठी दूरगामी उपाययोजना गरजेचे असल्याचे मत परिसरातील शिवभक्त पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्या किल्ले रायगडाची जबाबदारी असणार्या केंद्रीय पुरातत्व विभागाने या नव्याने निर्माण होणार्या समस्या संदर्भात योग्य कार्यवाही करण्याची अपेक्षा शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे.
मागील वर्षी 350 व्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिना दरम्यान झालेल्या दोन घटना नंतर किल्ले रायगडावरील दरड कोसळल्या संदर्भात रायगड प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीचे उपायोजना करण्यात आली होती चालू वर्षी या संदर्भात देखील या दोन्ही शासकीय यंत्रणांकडून करण्यात आलेली कामे तेवढीच महत्त्वपूर्ण ठरली आहेत.
गेल्या तीन ते चार वर्षात किल्ले रायगड परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नवीन समस्यांची निर्मिती झाली असून यावर मात करण्यासाठी स्थानिक प्रशासनामार्फत शासनाकडून देण्यात येणार्या नैसर्गिक आपत्ती संदर्भातील घडामोडींची माहिती रायगड परिसरात प्राधान्याने देण्याबाबत तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता प्रतिपादित होत आहे.
रायगड प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी किल्ल्यावरील संवर्धन व संविधानाची कामे केंद्रीय पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येत होती मात्र त्यांच्या अधिकारात कोणतीही सुविधा किल्ल्यावर झाली नसल्याचे शिवभक्तांनी निदर्शनास आणले. रायगड प्राधिकरणापूर्वी एमटीडीसीच्या माध्यमातून विश्रामगृहे उभारण्यात आली होती याकडे शिवभक्तांनी लक्ष वेधले. किल्ल्याची मालकी म्हणून केंद्रीय पुरातत्त्व विभाग कार्यरत असताना या झालेल्या नैसर्गिक आपत्ती संदर्भात केंद्रीय स्तरावरून विशेष उपाय योजनेबाबत कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा शिवभक्तांमधून व्यक्त होत आहे.
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर सुरू झालेल्या संवर्धनाच्या कामानंतर गडावर येणार्या शिवभक्त पर्यटकांच्या संख्येत झालेली लाखोंची वाढ ही स्थानिक प्रशासनासमोर देखील एक नवीन कसोटी ठरली आहे. येणार्या हजारो शिवभक्तांच्या सुख-सोयी करीता विविध योजनांची निर्मिती शासनाला करावी लागत आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे या किल्ल्याची पूर्ण जबाबदारी असून, या संदर्भात या विभागाकडून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही याकडे शिवभक्तांनी लक्ष वेधले आहे.