

अलिबाग: पावसाळ्याला अजून दोन महिने उरले असले तरी रायगडात आतापासूनच आगोटची तयारी सुरू झाली आहे.विशेष करुन सुकी मच्छीखरेदीकडे कल वाढला आहे. त्या मच्छीचा घमघमाट अलिबागसह विविधठिकाणच्या मच्छी बाजारात सुटला आहे.
रायगड आणि सुकी मच्छी यांच अतुट असे नातं.दरवर्षी लाखो टन सुकी मच्छीची उलाढाला रायगडात होते.पावसाळ्यात तर सुकी मच्छीला जादा भाव असतो.पावसाळ्यात मासळी हंगाम बंद असतो.त्यामुळे खवय्यांना सुकी मच्छीवरच ताव मारावा लागतो.पण सुकी मच्छीही जेवणाची लज्जत वाढविणारी असते.
यामुळे सुक्या म्हावऱ्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसून आलेलाआहे.सुक्या मच्छीत सोडे, कोळंबी, सुकट, जवळा, बोंबील, वाकट्या, मांदेली, बांगडा, सुरमई आदी सुकी मच्छीला ग्राहकांची विशेष पसंती असते.सुकट,जवळा तर किलो किलोने घेतला जातो. अलिबाग, सासवणे, आक्षी, मुरुड, काशिद आदी किनाऱ्यावर मिळणाऱ्या सुकट, जवळ्याला मागणी सर्वाधिक असते. यामुळे पावसाळ्यात या सुक्या म्हावऱ्याचा घराघरात वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
सध्या बाजारात सोडे 2000 ते 2200 रुपये किलो, सुकट 250 ते 300 किलो, बांगडा 250 ते 300, वाकट्या 300 ते 400 ,मांदेली 150 ते 200 किलो अशा दराने विकली जात आहे. अजून हंगाम संपायला दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे जेवढी ताजी मच्छी मिळेल तेवढी ती सुकविण्याचे काम मच्छीमारांमार्फत केले जात आहे.
कोळीवाड्यातील सर्वच ओट्यांवर कडक उन्हात ओली मच्छीचे वाळवण घातल्याचे दिसत आहे.सुक्या मच्छीला मुंबई,पुण्यात विशेष मागणी असते.पुण्यातील पर्यटक श्रीवर्धन,दिवेआगर परिसरात मोठ्या प्रमाणात येत असतात.ते जाताना सुकी मच्छी सोबत घेऊन जाऊ लागलेले आहेत. ऐन मे महिन्यात या पदार्थांना मागणी वाढणार आहे.
वाळवणी पदार्थांतून रोजगार
सुक्या मच्छीप्रमाणेच रायगडच्या ग्रामीण भागात तयार करण्यात येणारे वाळवणाचे पदार्थ उन्हात ठेवल्याचे चित्र जागोजागी दिसू लागलेले आहे.यामुळे महिलांना मोठा रोजगार मिळू लागलाय. उडदाचे पापड,कुरडई,पोहे,नाचणी,तांदूळ आदी विविध प्रकारच्या पापडांनाही आता मागणी वाढू लागली आहे. लालमिरचीचे तयार तिखट,घरगुती मसाले, कोकम,आवळा सरबतेही विक्रीस ठेवण्यात आलेली आहेत.पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून या पदार्थांना मोठी मागणी होत आहे.याशिवाय रायगडचा सुप्रसिद्ध पांढरा कांदाही जागोजागी विक्रीस ठेवण्यात आलेला आहे.