रत्नागिरी : प्रदूषणकारी प्रकल्प नको अशी जिल्हावासियांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. आता रत्नागिरीत येणारे दोन्ही प्रकल्प विनाप्रदूषणकारी असल्याने प्रदूषण होण्याची सुतराम शंका नाही. या प्रकल्पांचे आता स्थानिकांनी स्वागत करायला पाहिजे, अशा उद्योगांच्या पाठीशी उभे रहायला पाहिजे अशा भावना राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. स्थानिकांनी आता मुंबईकडे जाणे सोडून याच ठिकाणी रोजगार मिळवावा असेही त्यांनी सांगितले. जवळपास कुशल-अकुशल असे अडतीस हजार रोजगार या दोन प्रकल्पातून उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोकण म्हटला की प्रकल्पांना विरोध असाच प्रचार उद्योजकांमध्ये झालेला आहे. त्यामुळे विनाप्रद्यणकारी प्रकल्प आणतानाही आपल्याला तारेवरची कसरत करावी. लागली आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आपण विशेषतः आभार मानतो असे त्यांनी सांगितले. वेल्लोर इन्फरर्मेशन टेक्नॉलॉजी व रिलायन्स इन्फ्रासाठी त्यांनी पाठिंबा दिला. प्रकल्प परराज्यात विशेषतः गुजरातला जात असल्याची टिका करण्यात येत होती. मात्र खूप मोठी गुंतवणूक रत्नागिरीत होत आहे.
हे दोन प्रकल्प येण्यापूर्वी किमान दहा ते पंधरा हजारजणांना रोजगार मिळेल असे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होता. परंतु या दोन्ही उद्योगांमुळे सुमारे ३८ हजारजणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. वेल्लोर इन्फरर्मेशन झाडगाव टेक्नॉलॉजीसाठी एमआयडीसीतील स्टरलाईटची चारशे एकर जागा आणि रिळ-उंडीतील जागा देण्यात येणार आहे. वेल्लोरमध्ये कुशल-अकुशल अशा तीस हजारजणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. तीन वर्षात प्रकल्प बांधून पूर्ण होईल. या ती वर्षात स्थानिक कारागिरांच्या हाताला काम मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या तरुणाई मुंबईकडे जात आहे. या तरुणांनी आता रत्नागिरीतच थांबले पाहिजे, आयटीआय, टाटा ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून या उद्योगांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी वेल्लोर कंपनी व टाटाचे लवकरच टाईप होणार असून त्यातील प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना उद्योगांमध्ये रोजगार मिळणार आहे.
डिफेन्स क्लस्टरमध्ये रिलायन्स इन्फ्रा ही कंपनी धीरुभाई अंबानींच्या नावाने संरक्षक विषयक प्रकल्प उभारत असून हा १० हजार कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला कॅबिनेटच्या एका कमिटीची परवानगी मिळाली की तिचा मार्ग येत्या चार-पाच दिवसात मोकळा होईल असेही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.