

रायगड : जयंत धुळप
रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमीनी औद्योगिक कारणासाठी खरेदी केल्या मात्र या जमिनीचा वापर, विहीत कालावधीत औद्योगिक कारणासाठी करणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात गेल्या १५ वर्षांत कारखाना वा उद्योग उभारला नाही अशा २११ कंपन्या असून त्यांच्या ताब्यात १ हजार ५७० हेक्टर शेत जमीन आहे. याच २११ कंपन्यांना जिल्हा प्रशासनाकडून सूनावणीच्या नोटीसा जाताच, कंपनी मालक व व्यवस्थांपनांची एकच धावपळ उडाली होती.
नोटीसा बजावण्यात आलेल्या २११ पैकी तब्बल १३५ कंपन्याचे प्रतिनिधी ,वकील आज प्रत्यक्ष सुनावणी करिता हजर झाले होते. सुनावणी दरम्यान त्यांच्याकडून विविध कारणे दाखल करण्यात आली आहेत तर काही कंपनी व्यवस्थापनांनी प्रकल्प मंजूरीतील विलंब , आर्थिक अडचणी या कारणांमुळे प्रत्यक्ष कारखान्यांची उभारणी करता आली नसल्याचे कारण दिले आहे. त्यांच बरोबर याकरिता मुदत वाढ मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती रायगडचे अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली.
दरम्यान २११ पैकी उर्वरित ७६ कंपन्या येत्या दोन दिवसांत सुनावणी करिता येणे अपेक्षीत आहे. त्यांच्या सूनावण्या झाल्यावर या एकुण २११ कंपन्याच्या कारणांची पडताळणी करुन त्यावर निर्णय घेण्यात येईल. मुदवाढीसाठी पात्र ठरणाऱ्या कंपन्याचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करिता पाठवण्यात येतील व तेथे अंतिम निर्णय होईल असे ढोले यांनी पूढे सांगीतले. मात्र सुनावणीस आलेच नाहीत तर शासना नियमा नुसार त्यां कपंन्याच्या जमीनी शासनजमा होवू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यात एकुण ६६६ कंपन्यानी या शेतजमीनी खरेदी केल्या असून त्यांचs एकुण क्षेत्र ५ हजार २४० हेक्टर आहे. या पैकी या २११ कंपन्यांनी जमीन खरेदी केल्यावर पंधरा वर्षांचा कालावधी संपल्या नंतर देखील प्रत्यक्ष जमीन वापर सुरु केलेला नाही. या २११ कंपन्याच्या ताब्यातील एकुण जमीन क्षेत्र १ हजार ५७० हेक्टर आहे. याच २११ कंपन्याना आता जिल्हा प्रशासनाकडून वापर का सूरु केला नाही या अनूशंगाने या सुनावण्या सध्या सूरु आहेत.