

कमलेश ठाकूर
पेण: भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाच्या अमृत भारत योजनेतील रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकाचा नव्याने कायापालट करण्यासाठी नाव निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे व पेणचे नगराध्यक्ष प्रीतम पाटील व पेण रेल्वे प्रवासी संघ व सदस्य यांनी नुकतीच मुंबईच्या रेल्वे प्रबंधकांच्या सोबत सविस्तर चर्चा केली आणि पेण रेल्वे टेशन येथे कोणकोणत्या नवीन सुविधा करावयाच्या आहेत याची माहिती जाणून घेतली.
पेण येथील रेल्वे स्टेशन गेले वीस वर्षापासून बनविले गेले आहे. तसेच आजही आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनचे संपूर्णपणे नूतनीकरण करावे. तसेच येथील स्वच्छता गृह, अपुरी प्रवासी बेठक व्यवस्था, संपूर्ण शेड नाही आणि सर्वात म्हणजे फूट ओव्हर ब्रिज प्लॅटफॉर्मच्या एकाच टोकाला आहे. हायवेवरून रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी एकच मार्ग आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडयांना थांबा पेण येथे नाही अशा सूचना या बेठकीतून पेण नगराध्यक्ष, आणि प्रवासी सदस्यांनी मांडल्या.
अमृत भारत योजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील पेण रेल्वे स्थानकाचा अजून विकास करण्याच्या दृष्टीने लवकरच पेण येथे रेल्वे महामंडळाचे पदाधिकारी यांची भेट होणार आहे. यातून ते रेल्वे स्थानकाचा अधिक विकास कसा करता येईल यावर चर्चा होईल.
या भेटीदरम्यान रेल्वे समितीचे सदस्य व प्रवासी संघाचे सदस्य उपस्थित राहतील. यातून पेणला नव्याने मध्यवर्ती सरकता जिना किंवा फूट ओव्हर ब्रिज तसेच पेण रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा मार्ग अधिक रुंदीकरण करावे, खाजगी गाड्यांच्या पार्किंगची सुविधा तसेच रेल्वे स्टेशन येथे आणखीन एक स्वच्छतागृह तसेच प्रवासी प्रतीक्षागृहाची सुसज्जता वाढवणे, प्रवासी बैठक व्यवस्था वाढविणे,यावर चर्चा व निर्णय होणार आहे.
त्याचबरोबर आणखीन काही एक्सप्रेस पेण येथे थांबवण्यात येणार असून काही पनवेल, पेण सार ख्या मेमो पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू होणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त रेल्वे ट्रॅक याबाबतही चर्चा होईल. यामुळे एकूणच पेण रेल्वे स्थानकाचा नव्याने अधिक विकास होणार आहे.
पेणला केवळ थांबतात सातच रेल्वे
पेण रेल्वे स्टेशन हे मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती असे स्टेशन आहे. पेण येथूनच जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र अलिबाग हे आहे तर पूर्व दिशेला खोपोली हे शहर आहे व पेण रेल्वे टेशन नजीक जेएसडब्ल्यू सारखी कंपनी कार्यरत आहे.
यामुळे पेण येथे प्रवासी क्षमता भरपूर आहे मात्र त्या मानाने पेण येथे थांबणाऱ्या केवळ सातच रेल्वे आहेत. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पेण रेल्वे स्थानक हे कमी पडत आहे.
पर्यायाने अलिबागसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी व जेएसडब्ल्यू कंपनी खोपोली अशा ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना पेणपासून मागे ३० किलोमीटर असणाऱ्या पनवेल रेल्वे स्थानकावर उतरावे लागते व तेथून पुन्हा पेण येथे एसटी मार्गाने किंवा प्रायव्हेट गाडीने यावे लागते, मात्र पेण येथे जलद एक्सप्रेस रेल्वेला थांबा मिळाल्यास प्रवासी क्षमता वाढू शकते. यासाठी पुढील काही काळात काही एक्सप्रेस गाड्यांना पेण येथे थांबा मिळणार आहे. त्यावेळेस पेण येथील मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अजून वाढू शकेल.