

खांदा काॅलनी: पनवेल, उरण व कर्जत परिसरातील अनेक वीज ग्राहकांना गेल्या 15 दिवसांमध्ये वीज पुरवठा खंडीत होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीने उपाययोजना केली असली तरी आगामी काळात वीज ग्राहकांना देण्यात येणारी सेवा ही परिपूर्ण असावी, असे आवाहन खा.श्रीरंग बारणे यांनी आज पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात घेतलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत केले आहे. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली.
सदर बैठक खा.श्रीरंग बारणे यांनी आयोजित केली होती. या बैठकीला पनवेल, उरण व कर्जत येथील वीज वितरण कंपनीचे अधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने अधिक्षक अभियंता दिपक पाटील यांच्यासह इतर अधिकारी वर्ग, जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे, महानगरप्रमुख व नगरसेवक ॲड.प्रथमेश सोमण, नगरसेविका सायली सरक, शहरप्रमुख तुकाराम सरक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वीज वितरणाची माहिती द्या
आगामी पावसाळ्याच्या काळात वीज वितरणमध्ये काही त्रुटी किंवा विद्युत पुरवठा खंडीत झाला तर कुठे संपर्क साधावा या संदर्भात सर्व नागरिकांना, शासकीय यंत्रणेला याची माहिती वेळोवेळी देण्यात यावी. ग्राहक हा राजा असून त्याला वीज पुरवठा कशा तऱ्हेने सुरळीत मिळेल याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे.
कार्यालयामध्ये तुमचे अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे आहे. एखादी घटना घडल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी पोहचून तेथील खंडीत वीज पुरवठा सुरळीत करून देण्यात यावा, ग्रामीण भागात सुद्धा तेथील बांधवांना वीज पुरवठा कशा तऱ्हेने सुरळीत मिळेल याकडे लक्ष घालावे, यासाठी केंद्र शासनाकडून जी काही मदत लागेल ती करण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.