Panvel Police|हरवलेले तब्बल २५ लाखांचे १२२ मोबाईल फोन नागरिकांच्या स्वाधीन
पनवेल प्रतिनिधी :- नवी मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची आणि जनसेवेची जाणीव नागरिकांना करून दिली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष-३ पनवेल यांनी तब्बल २५ लाख रुपये किंमतीचे १२२ हरवलेले मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांकडे परत सुपूर्द केले. या कार्यवाहीतून अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
विशेष म्हणजे, मोबाईल फोन हे केवळ संवादाचे साधन नसून त्यात नागरिकांच्या आठवणी, महत्वाची माहिती आणि कामाशी संबंधित कागदपत्रेही सुरक्षित असतात. त्यामुळे मोबाईल हरवणे हा नागरिकांसाठी केवळ आर्थिकच नव्हे तर भावनिक धक्का असतो. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी शासनाने कार्यान्वित केलेल्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा प्रभावी वापर गुन्हे शाखेने केला. या प्रणालीच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल ओळखणे आणि त्यांचा मागोवा घेणे सुलभ झाले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या तांत्रिक साधनाचा योग्य उपयोग करून हरवलेले मोबाईल शोधून काढले.
शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन संबंधित मालकांना परत करण्यात आले. या वेळी नागरिकांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद स्पष्ट दिसत होता.
मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असलेल्या नवी मुंबई परिसरात प्रवासादरम्यान, खरेदी करताना किंवा कामाच्या धावपळीत मोबाईल हरवण्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यांत नोंदवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची ही कामगिरी नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरली आहे

