

नाते : इलियास ढोकले
वाढत्या उन्हाळ्यामुळे रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कडक उन्हात पर्यटकांना थांबण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी पुरेशी निवारा शेड तसेच अत्यावश्यक काळात आरोग्य केंद्राची निर्मिती नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे.
रायगड किल्ल्यावर विविध ठिकाणी कायमस्वरूपी निवारा शेड व कायमस्वरूपी गडाच्या विविध पाच ते सहा ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागील काही वर्षात तापमानात झालेल्या प्रचंड वाढीने किल्ले रायगडावर नवे संकट उभे राहिले असून यासाठी मार्ग काढण्याकरता रायगड प्राधिकरण व केंद्रीय पुरातत्व विभागाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.
रायगडावर दुपारच्या वेळेत तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून पर्यटकांना सावलीसाठी झाडे किंवा उपलब्ध जागांचा आधार घ्यावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक पर्यटक काही वेळ विश्रांती घेऊन किल्ल्याचा इतिहास अनुभवण्याऐवजी उन्हामुळे लवकर खाली परतण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे पर्यटनावरही परिणाम होत असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. किल्ल्यवरील ऐतिहासिक बाजारपेठ परिसरातील काही मोकळ्या जागांचा योग्य नियोजन करून निवारा शेडसाठी उपयोग केला जाऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी पर्यावरणपूरक आणि ऐतिहासिक वास्तूला साजेशी रचना असलेले शेड उभारल्यास पर्यटकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
आरोग्य केंद्राची गरज
किल्ले रायगडावर मागील काही वर्षात घडलेल्या अपघाताच्या घटना लक्षात घेता गडावर कायमस्वरूपी पाच ते सहा ठिकाणी आरोग्य केंद्राची व्यवस्था असणे गरजेचे झाले आहे या ठिकाणी अद्ययावत यंत्रणेसह मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास दुर्दैवाने घटना घडल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.