

जेएनपीए: अवघ्या चार महिन्यांतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने जवळपास 4 लाख प्रवाशांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. दिवसेंदिवस नवी मुंबई विमानतळच्या व्यवसायात मोठया प्रमाणात प्रगती होत असून प्रवाशी सुद्धा मोठया प्रमाणात या सेवा सुविधाचा लाभ घेताना दिसत आहेत.
व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच विमानतळाने जवळपास 4 लाख प्रवाशांचा टप्पा गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. देशांतर्गत विमान वाहतुकीत या विमानतळाने अल्पावधीतच महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.
जागतिक ट्रॅव्हल डेटा संस्थाच्या आकडेवारीनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आतापर्यंत 3 लाख 93 हजार 819 प्रवाशांनी प्रवास केला आहे. या कामगिरीमुळे हा विमानतळ देशातील नववा सर्वाधिक व्यग्र देशांतर्गत विमानतळ ठरला आहे.
सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 उड्डाणे, तर आठवड्याला जवळपास 1100 उड्डाणे सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय उड्डाणे अद्याप सुरू नसतानाही प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय सेवा सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
विमानतळाचा पहिला टप्पा सध्या कार्यान्वित असून, त्यामध्ये एक धावपट्टी व एक टर्मिनल सुरू आहे. दुसऱ्या धावपट्टीसह नवीन टर्मिनल इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, तिसऱ्या धावपट्टीसाठी अभ्यास प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. व्यवसाय तसेच आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने आता नवी मुंबई विमानतळला महत्वाचे स्थान प्राप्त झाल्याचे दिसत आहे.
पहिल्या टप्प्यांत वर्षाला 2 कोटी प्रवासी
पहिल्या टप्प्यांत वर्षाला 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता असलेल्या या विमानतळाची क्षमता 2032 पर्यंत वाढवून 9 कोटी प्रवासी प्रति वर्ष करण्याचे नियोजन आहे. त्यावेळी येथे एकूण चार टर्मिनल्स कार्यरत असतील.