

Navi Mumbai Airport Terminal Leakage Video
पनवेल: देशातील अत्याधुनिक विमानतळांपैकी एक मानल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्याच पावसात गळती झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. टर्मिनलमधील बॅगेज बेल्ट परिसरात छतामधून पाणी गळत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये बॅगेज बेल्टच्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी गळताना दिसत आहे. या गळतीमुळे बेल्टवर येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा भिजल्या असून, काही सामानाचे नुकसान झाल्याचाही दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा सुरू आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील टर्मिनल-१चे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते. सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अवघ्या काही महिन्यांत गळतीसारखी समस्या समोर आल्याचा दावा होत असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मात्र, या घटनेसंदर्भात विमानतळ प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तसेच व्हायरल व्हिडिओतील दृश्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित घटनेची सत्यता आणि त्यामागील कारणे प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतरच स्पष्ट होणार आहेत.
दररोज सुमारे २० हजार प्रवासी आणि १५० हून अधिक विमानांची ये-जा असलेल्या या विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सुविधा व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.