

अलिबाग: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन सुरू आहे. पनवेल ते झाराप या मुंबई-गोवा महामार्गावरील ४१७ किमी मार्गाचे चौपदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच विधानसभेत दिली. यामुळे कोकणवासियांच्या प्रवासातील मोठा अडथळा दूर होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. या शहरातून महामार्गाची वाहतूक जात असल्याने विशेषतः सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रवाशांना अनेक तास अडकून रहावे लागते.
ही समस्या लक्षात घेऊन माणगाव बाह्यवळण मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. या मार्गामुळे माणगाव शहरातील अवजड आणि लांब पल्ल्याच्या वाहनांची वाहतूक बाहेरून - वळवता येणार आहे. परिणामी शहरातील ने वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.
विशेषता गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि इतर भागांतून लाखो नागरिक खासगी वाहनांनी कोकणात दाखल होतात.
यामुळे गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच विधानसभेत दिली.
माणगाव बाह्यवळण मार्गाची लांबी ७.५ किलोमीटर असून या मार्गावर तीन उड्डाणपूल आहेत. त्यापैकी एका उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित दोन मोठ्या पुलांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
हे दोन्ही पूल ३१ जुलैपर्यंत पूर्ण होतील. माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल. इंदापूर बाह्यवळण मार्ग ३.५ किलोमीटर येथील लांबीचा असून उड्डाणपुलाचे ४० टक्के काम झाले आहे. हा पूल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. संपूर्ण बाह्यवळण मार्ग २८ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
पनवेल ते झारप या ४४९ किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी ४१७ किमी चौपदरीकरण पूर्ण झाले. उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल. संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाच्या पोहोच मार्गाची कामेही प्रगतिपथावर आहेत, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
प्रवासाचा वेळ वाचणार
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. या काळात मुंबई-गोवा महामार्गावर होणारी गर्दी लक्षात घेता माणगाव बाह्यवळण मार्गाचा एक भाग सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच वाहनचालकांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो कोकणवासीयांना या निर्णयाचा फायदा मिळणार असून, शासनाच्या या प्रयत्नांमुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.