

माथेरानच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने जरी याठिकाणी येण्यासाठी नेरळ मार्गे माथेरान ह्याच मार्गशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसताना देखील मुख्य प्रवेशद्वार असणार्या दस्तुरी पासून गावात येण्यासाठी अल्प प्रमाणात असलेल्या ई -रिक्षांमुळेच इथे पावसाळ्यात कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. याच दोन वर्षात इथे वर्षाऋतु मध्ये पर्यटकांची नियमितपणे एकप्रकारची जत्रा भरलेली दिसते. वेळप्रसंगी राहायला खोल्या सुध्दा उपलब्ध होत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक विशेष करून शनिवार आणि रविवार यादिवशी केवळ ई-रिक्षा सुरू झाल्यापासूनच गर्दी करताना दिसत आहेत.ययाच सर्वांनाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
एकूण फक्त वीस ई -रिक्षा सर्वांच्या सेवेस तत्पर असतात. परंतु पंधरा रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना नियमितपणे ने आण करत असून पाच रिक्षा पर्यटक, नागरिक, रुग्णांची सेवा करण्यास सज्ज असतात. त्यातच येथील रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय बनलेली असल्याने चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्त्यांमुळे सतत रिक्षाना दुरुस्तीसाठी नेरळ अथवा पनवेल याठिकाणी न्याव्या लागत आहेत.त्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यासाठी इथे रीक्षांची संख्या वाढल्याशिवाय सर्वाना वेळेवर सुरळीतपणे सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही.
दस्तुरी जवळील काळोखी ह्या तीव्र चढावाच्या भागात रस्ता खूपच खडतर बनलेला असून अधिकारी वर्ग नियमित याच ई रिक्षातून प्रवास करतात त्यांनी प्रामुख्याने ह्या खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.रिक्षा, पर्यटक,घोडे आणि पादचार्यांची याच अरुंद रस्त्यावरून सातत्याने रहदारी सुरू असते. लवकरच हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनविला नाही तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संतोष लखन, माजी नगरसेवक
आम्ही देशातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत. भले त्याठिकाणी मोटार गाड्या धावतात. माथेरान हे एक सुंदर ठिकाण आहे. प्रदूषण मुक्त स्थळ आहे, परंतु इथल्या रस्त्यांची व्यवस्था उत्तम प्रकारे करणे आवश्यक आहे. ई रिक्षातून येत असताना खूपच खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना त्रासदायक ठरले.
सिद्धेश्वर पटनाईक, पर्यटक मुंबई